'लवकरच जाणार मंत्रिमंडळातील सहा सात मंत्र्यांचा बळी'
भाजप नेत्यांकडूनच रसद पुरवली जात असल्याचा राऊत यांचा दावा
मुंबई: प्रतिनिधी
संतोष देशमुख हत्याप्रकरणी धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळातील आणखी सहा सात मंत्र्यांचा लवकरच बळी जाणार असल्याचे भाकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केले आहे. अशा मंत्र्यांना खिंडीत पकडण्यासाठी भाजप नेत्यांकडूनच आपल्याला रसद पुरवली जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
पुण्याच्या जिल्हा नियोजन बैठकीसाठी आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांच्या पाठोपाठ सहा महिन्यात आणखी एका मंत्र्यांची गच्छंती अटळ असल्याचे विधान केले होते. राऊत यांनी त्यांच्या पुढे पाऊल टाकत ही संख्या सात आठवर नेली आहे.
धनंजय मुंडे यांच्यानंतर मंत्री जयकुमार रावल आपल्या निशान्यावर असल्याचे राऊत यांनी सांगितले. त्यांनी स्थापन केलेल्या रावळ सहकारी बँकेत कोट्यावधी रुपयांचे घोटाळे झाले आहेत. जनतेचा पैसा लाटला आहे. हे प्रकरण मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे देणार आहे. आपण या लोकांना जनतेचे पैसे लुटण्याचा परवाना दिला आहे काय, असा सवाल त्यांना करणार आहे, असेही राऊत म्हणाले.
जयकुमार रावळ हे अत्यंत भ्रष्ट मंत्री असून त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची जमीन लाटली आहे. खुद्द माजी राष्ट्रपतींची जमीन हडपण्यापर्यंत त्यांची मजल गेली आहे. अशाच प्रकारे महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करणारे आणखी सात आठ मंत्री मंत्रिमंडळात आहेत. या मंत्र्यांचे लवकरच बळी जाणार आहेत. त्यासाठी आम्हाला भाजपच्या नेत्यांकडूनच बळ दिले जात आहे, असा दावाही राऊत यांनी केला.
Comment List