- राज्य
- 'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे'
'नितीन गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे'
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
इथेनॉल सक्तीप्रकरणी केंद्रीय दळणवळण व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर आरोप होत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी गडकरी यांची पाठराखण केली आहे. सहकार चळवळीत गडकरी यांचे योगदान मोठे आहे. त्यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, अशी ग्वाही शरद पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.
साखर उद्योग हा केवळ साखरेच्या उत्पादनावर अवलंबून ठेवणे परवडणारे नाही. साखरेच्या बरोबरीने सहवीज निर्मिती, अल्कोहोल व इथेनॉलसारख्या सह उत्पादनांची निर्मिती यांची जोड देणे अत्यावश्यक आहे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. इथेनॉलशी संबंधित गडकरी यांचे धोरण शेतकऱ्यांच्या हिताचे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
हैदराबाद गॅझेटियरबाबत शासन निर्णय आला अंगाशी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठीचा शासन निर्णय देखील काढण्यात आला. मात्र, प्रत्यक्षात हा निर्णय सरकारच्या अंगाशी आल्याचे दिसून येत असल्याची टीका शरद पवार यांनी हैदराबाद गॅझेटियर लागू केल्यानंतर
हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या निर्णयानंतर बंजारा समाजाच्या आदिवासी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसह अन्य वेगवेगळ्या समाजाकडून वेगवेगळ्या मागण्या पुढे येऊ लागल्या आहेत. त्यामुळे समाजासमाजामध्ये तेढ वाढत चालली आहे, असे पवार यांनी सांगितले.
पावसाने झोडपलेल्या शेतकऱ्यांना मदत द्या
सध्याच्या काळात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांना झोडपून काढले आहे. तब्बल 40 लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे पावसामुळे नुकसान झाले आहे. यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना विना विलंब आर्थिक मदत मिळावी यासाठी आपण लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची भेट घेणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार या दोघांकडे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन निधी उपलब्ध असतो. त्याचा वापर करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत मिळाली पाहिजे, अशी मागणी पवार यांनी केली.