- राज्य
- 'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको'
'आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी समाजावर अन्याय नको'
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे प्रतिपादन
मुंबई: प्रतिनिधी.
इतर मागास प्रवर्गाला मिळालेले आरक्षण त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात मुळातच कमी आहे. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय नको, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. हैदराबाद गॅझेटियर लागू केले तरीही मराठा समाजाला सरसकट आरक्षणाचा लाभ होणार नाही, असे महत्त्वपूर्ण विधानही त्यांनी केले.
मराठा समाजाला यापूर्वीच आर्थिक मागासलेपणाच्या निकषावर दहा टक्के आरक्षण देण्यात आले आहे. मराठा समाजाचा सरसकट इतर मागास प्रवर्गात समावेश केल्याने या प्रवर्गातील इतर घटकांवर अन्याय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ओबीसी आरक्षण सुरक्षित ठेवून मराठा समाजाला आरक्षण द्यावे, अशी सूचना त्यांनी राज्य सरकारला केली आहे.
सध्या शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे राजकीय दृष्ट्या एकत्र येण्यावरून राज्यभरात चर्चा सुरू आहे. त्याबाबतही आठवले यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कोणताही मोठा बदल घडून येणार नाही. ते दोघे एकत्र आले तरी मुंबई महापालिका ही त्यांना जिंकता येणार नाही, असा दावा आठवले यांनी केला. मुंबई महापालिकेवर महायुतीची सत्ता असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यभरातील वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या आणि अनेक शहरांमध्ये देवाभाऊंच्या जाहिराती झळकल्या. त्यावर विरोधकांकडून आणि सर्वसामान्य नागरिकांकडूनही टीका केली जात आहे. त्याबाबत बोलताना आठवले म्हणाले की, फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. वास्तविक अनेक दशकांपासून होत असलेल्या मराठा आरक्षणाच्या मागणीला मराठा समाजातील मुख्यमंत्र्यांनी न्याय दिला नाही. तो फडणवीस यांनी दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जाहिराती आणि फलक लागलेच पाहिजेत, असेही आठवले म्हणाले.