- राज्य
- पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती
पथनाट्य सादर करत केली स्वच्छताविषयक जनजागृती
‘अवकारीका’ चित्रपटाच्या टीमचा अभिनव उपक्रम
पिंपरी : प्रतिनिधी
मराठी चित्रपटाच्या प्रमोशनसाठी विविध कार्यक्रम किंवा उपक्रम राबवले जातात. पण पहिल्यांदाच चित्रपटाच्या टीमकडून संबंधित चित्रपट ज्या विषयावर भाष्य करणारा आहे, त्यावर थेट जनजागृती करण्यासाठी पथनाट्य सादर करण्यात येत आहे. निमित्त आहे लवकरच प्रदर्शित होणाऱ्या ‘अवकारीका’ या चित्रपटाचे. नेहरू नगर पिंपरी येथे शनिवारी ही जनजागृती करण्यात आली.
पर्यावरण संवर्धन आणि मानवी आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा स्वच्छता हा विषय घेऊन रेडबड मोशन पिक्चर्स द्वारा ‘अवकारीका’ हा चित्रपट १ ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छता केवळ घर किंवा परिसराची नाही तर मनामनातील स्वच्छता दूर करण्याचा संदेश देत आणि स्वच्छतेचा वसा प्रत्येकाच्या मनामनांमध्ये ठवसणारा हा चित्रपट प्रेक्षकांना आवडल्याशिवाय राहणार नाही. या सिनेमात एकीकडे स्वच्छतेचे महत्व तर अधोरेखित केलेच आहे, परंतु स्वच्छतेच्या प्रक्रियेतील महत्वाचा दुवा असणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या संघर्षाची गाथा अत्यंत ज्वलंत पद्धतीने मांडली आहे. त्यामुळे हा सिनेमा प्रेक्षकांमध्ये स्वच्छतेविषयी एक परिवर्तनवादी दृष्टिकोन तयार करेल, असा विश्वास या चित्रपटाच्या टीमने व्यक्त केला.
नेहरू नगर येथे पथनाट्य सादर करण्यात आले यावेळी निर्माता - दिग्दर्शक सीए अरविंद भोसले,
निर्माते अरुण जाधव, माजी नगरसेवक राहुल भोसले, यांच्यासह पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. चित्रपटाचे बहुतांशी चित्रिकरण पिंपरी - चिंचवड शहरात झालेले आहे.
याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक अरविंद भोसले म्हणाले, स्वच्छता हा विषय पर्यावरण व मानवी आरोग्यासाठी खूपच महत्वाचा आहे. या विषयावर आम्ही चित्रपट घेऊन आलो आहोत आणि हा चित्रपट लोकांपर्यंत जावा यासाठी जून्या पद्धतीचा वापर करत आहोत, पथनाट्य, वासुदेव अशा पारंपारिक साधनाचा वापर करत हा चित्रपट प्रेक्षकांपर्यंत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे.
निर्माते अरुण जाधव म्हणाले, कचरा ही आज मोठी समस्या आहे, ‘अवकारीका’ चित्रपट सफाई कामगार आणि कचरा करणारे अशा दोन्ही घटकांनी बघितला पाहिजे. समाजाला एक वेगळा दृष्टिकोन या चित्रपटाद्वारे मिळेल असा विश्वास आहे.
माजी नगरसेवक राहुल भोसले म्हणाले, ‘अवकारीका’ मधून एक महत्वाचा विषय मांडण्यात आला आहे, समाजकार्यात अनेक वर्षे असल्यामुळे या विषयाची मला कल्पना आहे, आज सोसायटी किंवा इमारती बाहेर कचरा फेकला जातो, अनेकदा गाडी मधून रस्त्यावर लोक कचरा फेकतात असे दिसते. या सिनेमाच्या विषयाचे गांभीर्य लक्षात घेता हा सिनेमा सर्व लोकांनी पहावा असे मी आवाहन करतो.हा चित्रपट पाहिल्या नंतर समाज बदलेल अशी अपेक्षा आहे.