- राज्य
- मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत
मानव व वन्यजीव संघर्ष टाळण्यासाठी तंत्रज्ञानांची मदत
जंगलात बसवणार एआय तंत्रज्ञानयुक्त कॅमेरे
मुंबई: प्रतिनिधी
सध्याच्या काळात प्राण्यांची संख्या वाढल्याने ते मानवी वस्त्यांजवळ येत असल्याने मानव वन्यजीव संघर्षाचे प्रमाण वाढले आहे. यात जीवितहानी टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेतला जाणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
ताडोबापासून नवेगाव बांधपर्यंत सर्व वनक्षेत्रांमध्ये तब्बल ९०० कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. कॅमेऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या तंत्रज्ञानाची जोड असेल. या कॅमेऱ्यांनी वाघासारखे प्राणी मानवी वस्तीकडे जात असल्याचे चित्रण टिपताच त्या वस्तीत अलार्म वाजतील. त्यामुळे माणसांना वन्य प्राण्यांच्या येण्याची माहिती मिळेल. ते आपल्या पाळीव प्राण्यांना आणि स्वतःला सुरक्षित ठिकाणी ठेवू शकतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.
मानव आणि पाळीव प्राण्यांना जंगली प्राण्यांपासून सुरक्षित ठेवणाऱ्या या प्रकल्पासाठी वनविभागाने मार्वल या कंपनीबरोबर सामंजस्य करार केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे आणि वन राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत हा करार करण्यात आला आहे.
शेतकऱ्यांना देणार आर्थिक मदत
वनक्षेत्रालगत असल्यामुळे वन्य प्राण्यांच्या वावरामुळे ज्या शेतकऱ्यांची जमीन पडीक झाली आहे, अशा शेतकऱ्यांना प्रति वर्ष प्रति एकरी ५० हजार रुपये भाडे तब्बल ३० वर्ष वनविभाग देणार आहे. या जमिनीवर वनविभाग सौर ऊर्जा प्रकल्प, बांबू लागवड, गवत लागवड असे प्रकल्प करणार आहे, अशी माहितीही बावनकुळे यांनी दिली.