- राज्य
- पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य
पहेलगाम हल्ल्यातील बळींच्या कुटुंबीयांना 50 लाखांचे अर्थसहाय्य
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 50 लाखांचे अर्थसहाय्य देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. आज पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीचा निर्णय घेण्यात आला आहे.
पहलगाम येथील बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांना घेरून त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. या हल्ल्यात 27 जणांचा मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. या हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली असून पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी कठोर पावले उचलण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली जात आहे.
या हल्ल्यात बळी पडलेले पुणेकर संतोष जगदाळे यांच्या मुलीला मुख्यमंत्र्यांचा विशेष अधिकार वापरून शासकीय नोकरी देण्यात येणार आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
डोंबिवली येथील अतुल मोने, संजय लेले आणि हेमंत जोशी तिघे मावस भाऊ कुटुंबियांसोबत काश्मीरला फिरायला गेले होते. त्यांना दहशतवाद्यांनी त्यांच्या कुटुंबियांसमोरच गोळ्या घातल्या. तर पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे हो दोघे मित्रही त्यांच्या कुटुंबासह पहलगाम येथे गेले होते. त्यांनाही दहशतावाद्यांनी डोक्यात गोळी मारून ठार केलं. तर नवी मुंबईतील दिलीप देसले यांचाही दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला.