- राज्य
- भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार
भारत पाक सामन्यात दीड लाख कोटी रुपयांचा जुगार
शिवसेना खासदार संजय राऊत यांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवरून कर्ज मिळू नये यासाठी प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारने ऐनवेळी कच खाऊन भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याला परवानगी दिली. या सामन्यात तब्बल दीड लाख कोटी रुपयांचा जुगार खेळला गेला आहे. त्यातील 25 हजार कोटी पाकिस्तानात गेले. तो पैसा पाकिस्तान भारता विरोधात वापरणार, असा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांश बोलताना केला.
भारत आणि पाकिस्तान क्रिकेट संघा दरम्यान काल झालेल्या सामना फिक्स करण्यात आला होता, असा आरोप संजय राऊत यांनी केला. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात ऑपरेशन सिंदूर जारी केले आहे. ते अजूनही पूर्ण झालेले नाही. भारताने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यांना काही महिने देखील पूर्ण झालेले नाही. या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तान बरोबर क्रिकेट खेळणे अयोग्य होते, असा दावा राऊत यांनी केला.
पहेलगाम दहशतवादी हल्ल्याच्या आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान क्रिकेट संघाबरोबर सामना खेळण्याची भारतीय संघाची इच्छा नव्हती. मात्र, केंद्र सरकारने आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने दबाव टाकल्यामुळे हा सामना खेळवला गेल्याचा आरोप यांनी केला.