शेतकऱ्यांच्या थकबाकी बिलासाठी पुन्हा उपोषण
मुंबई / रमेश औताडे
मुरबाड तालुक्यातील २०२०-२१ या वर्षातील ५०० शेतकऱ्यांचा ७९ लाख ७१ हजार २९२ रुपयांचा बोनस राज्य मंत्रिमंडळाने १ एप्रिल २०२५ रोजी मंजूर केला होता. अन्न व नागरी पुरवठा विभागाने आदेशही काढले, मात्र तीन महिने उलटूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर अद्याप पैसे जमा झालेले नाहीत, त्यामुळे शेतकरी संभ्रमात आहेत.
या प्रश्नासाठी लोकमित्र रमेश हिंदुराव यांनी २०२१ पासून आतापर्यंत १२ वेळा उपोषण केले. तहसील कार्यालय मुरबाड, आझाद मैदान तसेच नागपूर येथील अधिवेशनात वेळोवेळी आवाज उठवला. आमदर किसन कथोरे आणि आमदार संजय केळकर यांनीही विधानसभेत प्रश्न उपस्थित करून शासनाकडून मंजुरी मिळवली.
तरीही अद्याप बोनस रक्कम शेतकऱ्यांना मिळालेली नाही. एवढेच नव्हे, तर २०२४-२५ या वर्षातील घोषित बोनस देखील शेतकऱ्यांना मिळालेला नाही. बि बियाणे, खते, नांगरणी यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत वेळेवर न मिळाल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर २६ जून २०२५ पासून मुरबाड तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात येणार असून याची लेखी सूचना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अन्न व नागरी पुरवठा मंत्री, प्रधान सचिव, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आली आहे.
000