राज्यातील गोरगरीब आंदोलनकर्त्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणपोई : थंडगार पाण्याचा दिलासा !
मुंबई / रमेश औताडे
राज्यभरातून मुंबईतील आझाद मैदानात येणाऱ्या आंदोलनकर्त्यांना व गोरगरीब जनतेला थंडगार पिण्याच्या पाण्यासाठी आधार ठरलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणपोई आता दुरुस्ती व सुशोभीकरण करावी लागणार आहे. त्यासाठी " महाराणी अहिल्यादेवी प्रतिष्ठान मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी, सभासदांनी व हितचिंतकांनी सामाजिक योगदान म्हणून सहकार्य करावे असे आवाहन प्रतिष्ठान चे अध्यक्ष नागेश मोटे यांनी केले आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. आझाद मैदान जवळ असणाऱ्या या पाणपोई जवळ जयंती कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
आझाद मैदान मुंबई येथे भव्य स्मारक उभारणे, त्यांच्या चरित्रग्रंथाचे व फोटोची छपाई करून सर्वत्र वाटप प्रचार करणे, समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचे अहिल्यादेवींच्या नावे पुरस्कार देवून सत्कार करणे, परिसंवाद आणि मेळावे आयोजित करणे, ' जय मल्हार ' वेबसाईटची निर्मिती करणे, अशी अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत अशी माहिती प्रतिष्ठान चे सरचिटणीस रंगनाथ चोरमुले यांनी यावेळी दिली.
प्रतिष्ठानने गरीब, होतकरू अनाथ मुलांना शैक्षणिक आर्थिक मदत दिल्याने अनेक मुले शासकीय अधिकारी, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनियर झाली आहेत. गेली सतरा वर्षे आझाद मैदान येथे आंदोलन मोर्चे, मेळावे यासाठी राज्यभरातून येणाऱ्यांना तसेच वाहनचालक व नोकरदार जनसामान्यांना विनामूल्य जलदानाचे कार्य केले आहे असे खजिनदार शिवाजी यमगर यांनी सांगितले.
यावेळी क्रिडा उपसचिव संतोष गावडे, मुंबई महानगरपालिका उपायुक्त शरद उघडे व मुंबई महानगरपालिका पाणीपुरवठा मुख्य अभियंता पांडुरंग बंडगर, नगरविकास विभाग सचिव तुकाराम दिघे, ॲड.अभिमान पाटील, मुंबई महानगरपालिका निवृत्त वरिष्ठ अधिकारी लक्ष्मण व्हटकर, तंत्र शिक्षण सहायक संचालक कुंडलिक एडके, प्राध्यापक राजाराम काळे, शिक्षक शिवाजी पुणेकर, मुंबई विद्युत पुरवठा अधिकारी राज बंडगर, कार्यालयीन सचिव दाजीराम कटरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
000