- देश-विदेश
- 'दहशतवादाला पोसणे पाकिस्तानला थांबवावेच लागेल'
'दहशतवादाला पोसणे पाकिस्तानला थांबवावेच लागेल'
भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांचा इशारा
पुणे: प्रतिनिधी
दहशतवादी शक्तींना पोसणे पाकिस्तानला थांबवावेच लागेल. अण्वस्त्रांच्या माध्यमातून पाकिस्तानकडून केल्या जाणाऱ्या ब्लॅकमेलिंगला भारत कदापि बळी पडणार नाही, असा इशारा भारताच्या तिन्ही दलांचे प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी दिला.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानात जनरल चौहान बोलत होते. दहशतवादाला पाठीशी घालणे पाकिस्तानने थांबवावे, हेच ऑपरेशन सिंदूर चे उद्दिष्ट होते, असे जनरल चव्हाण यांनी स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूर दरम्यान भारतीय लष्कराच्या झालेल्या नुकसानाबद्दल सध्या मोठ्या चर्चा सुरू आहेत. या चर्चांना जनरल चौहान यांनी अत्यंत स्पष्ट प्रत्युत्तर दिले. व्यावसायिक लष्करांना त्यांच्या कामगिरीचे यश आणि कार्यक्षमता हे अधिक महत्त्वाचे आहेत. कामगिरी दरम्यान झालेल्या नुकसानाची पर्वा लष्कर करत नसते, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले. मोहिमेदरम्यान होणारे नुकसान सैन्याच्या मनोबलावर देखील परिणाम करू शकत नाही, असेही ते म्हणाले.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख जनरल असीम मुनीर यांनी भारत आणि हिंदू यांच्या विरोधात गरळ ओकली होती. भारताबद्दल पाकिस्तानमध्ये असलेला आकस जनरल मुनीर यांच्या वक्तव्यावरून दिसून येत असून त्यामुळेच दहशतवादाला चिथावणी दिली गेली, असेही जनरल चौहान म्हणाले.
दहशतवादाचे कोणत्याही सुसंगत तर्काने समर्थन केले जाऊ शकत नाही. दहशतवाद हा संघर्षाचा योग्य मार्ग नाही. झुल्फिकार अली भुट्टो यांनी सन 1965 मध्ये खुद्द संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत बोलताना भारताच्या विरोधात हजार वर्ष लढण्याचा इरादा व्यक्त केला होता. हजार जखमांनी भारताला रक्तबंबाळ करणे, हेच पाकिस्तानचे ध्येय आहे, असेही जनरल चौहान यांनी सांगितले.
भारताने दहशतवादा विरोधात लढण्याचा नवा मार्ग चोखाळला आहे. दहशतवाद आणि पाण्यासारखे नागरी स्त्रोत याची सांगड भारताने घातली आहे. त्यामुळे हजार जखमा करून भारताला रक्तबंबाळ करणाऱ्या पाकिस्तानला भारत यापुढे चोख प्रत्युत्तर देईल, हे स्पष्ट झाले आहे, असेही जनरल चौहान यांनी नमूद केले.