- देश-विदेश
- 'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका'
'पाचशे रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाका'
चंद्राबाबू नायडू यांची पंतप्रधानांकडे मागणी
कडप्पा: वृत्तसंस्था
राजकीय आणि दैनंदिन व्यवहारातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी डिजिटल चलनाचा गांभीर्याने विचार करावा आणि चलनातील उच्च मूल्याच्या, अर्थात ५०० रुपयांच्या नोटा रद्द कराव्या, अशी मागणी आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.
तेलगू देसमच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महानाडू या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमात नायडू बोलत होते. चलनी नोटांचे वाटप करताना राजकारण केले जाऊ नये, असेही ते यावेळी म्हणाले.
खरोखरच लोकांची सेवा करायची असेल तर भ्रष्टाचार संपुष्टात आणणे आवश्यक आहे. त्यासाठी उच्च मूल्याच्या नोटा रद्द करणे आवश्यक आहे. आता आपल्याकडे डिजिटल चलन उपलब्ध असल्यामुळे आपल्याला दोन हजार, एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटांची गरज उरलेली नाही, असे नायडू यांनी नमूद केले. भ्रष्टाचार संपुष्टात आणण्याचा तो एकमेव मार्ग असल्याचा दावा त्यांनी केला.
नोटबंदीनंतर देशात डिजिटल चलन उपलब्ध करून देण्याचा सल्ला आपण सन २०१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांना दिला होता, असेही नायडू यांनी सांगितले. नायडू हे त्यावेळी नीती आयोगाच्या तज्ज्ञ, भागीदार आणि मुख्यमंत्र्यांच्या समितीचे प्रमुख होते. चलनी नोटा अस्तित्वात नसलेली अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी उपाययोजना सुचविणे ही जबाबदारी या समितीवर सोपविण्यात आली होती.
भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढाईमध्ये मी आणि माझा पक्ष कोणतीही तडजोड करणार नाही, अशी ग्वाही देखील नायडू यांनी या कार्यक्रमात बोलताना दिली.