'हुंड्याच्या देवघेवीशिवाय साधेपणाने करणार लग्नसोहळा'
धायरी ग्रामस्थांचा अनुकरणीय ठराव
पुणे: प्रतिनिधी
हुंड्यासाठी सासरकडू छळ होत असल्याने घडलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर हुंड्याची प्रथा समोर नष्ट करून अत्यंत साधेपणाने मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नसोहळा पार पाडण्याचा ठराव धायरी येथील ग्रामस्थांनी संमत केला आहे. विशेष ग्रामसभेत याखेरीज अन्य स्तुत्य ठरावही मंजूर करण्यात आले.
हुंड्याच्या प्रथेमुळे तसेच भव्य लग्न सोहळ्यातील दिखाऊपणामुळे अनेक मुलींचे व त्यांच्या पालकांचे आयुष्य देशोधडीला लागले आहे. वैष्णवी हगवणे यांच्या मृत्यूमुळे ही बाब अधोरेखित झाली आहे. त्यामुळे या पुढील काळात हुंडा देणे घेणे पूर्णपणे बंद करण्याचा ठराव ग्रामस्थांनी केला.
त्याचप्रमाणे 'प्री वेडिंग फोटो आणि व्हिडिओ बंद करणे, लग्नातील भपकेबाजी टाळणे, केवळ शंभर ते दोनशे लोकांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पाडणे, लग्नापूर्वी नियोजित वधू-वरांची वैद्यकीय तपासणी करून घेणे, पैसे आणि वेळेची बचत करण्यासाठी एकाच दिवशी साखरपुडा आणि विवाह सोहळा पार पाडणे, असे ठराव या ग्रामसभेत मंजूर करण्यात आले.
चौका चौकात व वर्दळीच्या ठिकाणी. ठरवांचे फलक लावण्यात यावे, आदर्श विवाह सोहळा पार पाडणाऱ्या लोकांचा सत्कार करण्यात यावा, हुंडा देण्याऐवजी मुलीच्या नावाने मुदत ठेव ठेवण्यात यावी, विवाह सोहळ्यात डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा, जेवणात मर्यादित पदार्थांचा समावेश असावा, असेही ग्रामसभेत ठरवण्यात आले. बडेगाव करून साजरा होणाऱ्या विवाह सोहळ्यातून निघून जातील असा इशाराही या ग्रामसभेत देण्यात आला.