६५ वर्षांच्या आजींचा रिक्षावर आत्मनिर्भरतेचा प्रवास!
नांदगावच्या मंगल आवळेंनी मिळवले पक्के लायसन्स; जिद्दीला सलाम करत आरटीओ अधिकारीही झाले थक्क
राजेंद्र मोहिते/कराड : "वयाची साठी पार केली की, विश्रांतीच्या सावलीत बसावं", असं समाज सांगतो. पण काही व्यक्तिमत्त्वं अशी असतात की, ती त्या सावलीत बसण्याऐवजी आयुष्याला नवी दिशा देत समाजासाठी प्रेरणादायी ठरतात. अशीच एक विलक्षण कथा आहे, नांदगाव (ता. कराड) येथील ६५ वर्षीय मंगलबाई आवळे यांची. ज्या आजीबाईंनी नुकतीच तीन चाकी प्रवासी रिक्षा चालवण्याची परीक्षा यशस्वीपणे पूर्ण करत पक्क्या परवान्याचा टप्पा पार केला आहे.
आज त्यांच्या या यशाचं साक्षीदार ठरलं कराड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालय. सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विंदा गुरावे, मोटार वाहन निरीक्षक चैतन्य कणसे, सागर विश्वासराव, वैभव तोरणे व भारत गोरड यांच्या उपस्थितीत झालेल्या चाचणीत मंगलबाई आवळे या आजीबाईंनी रिक्षा अत्यंत आत्मविश्वासाने व अचूकतेने चालवून दाखवली. या चाचणीत त्यांना यश मिळालं आणि त्यांच्या पक्क्या परवाना प्रक्रियेला अधिकृत मान्यता मिळाली आहे.
पतीचे निधन... चार मुलांचा संसार... आणि त्यातून उभी राहिलेली एक "जिद्दी आई"!
मंगल आवळेंच्या जीवनात संघर्ष काही नवीन नाही. पतीचे अकाली निधन झाले, तेव्हा चारही मुलं लहान होती, एक मुलगा आणि तीन मुली. अशा वेळी बहुतेकजण परिस्थितीसमोर हात टेकतात, पण मंगलबाईंनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवला. त्यांनी मजुरी केली, छोटेमोठे उद्योग केले आणि मुलांचे शिक्षण-संसार पूर्णपणे उभे केले.
आज त्यांच्या मुलाचा संसार सुरू आहे. पण “आपला भार कोणावरही नको”, या विचाराने त्यांनी स्वतः रिक्षा शिकून “मुलाच्या संसाराला हातभार लागावा, हीच बाळगत ती जिद्दीने पूर्णत्वास गेली..
नियमांचं पालन करत मिळवलं अधिकृत लायसन्स
मंगलबाई रिक्षा चालवत असल्याची माहिती आरटीओ कार्यालयाला मिळाली. त्यानंतर त्यांना नियमांचं पालन करून परवाना मिळवण्याची सूचना देण्यात आली. अनेकजण घाबरून मागे हटले असते, पण त्यांनी या संधीचं सुवर्णात रूपांतर केलं. एप्रिल महिन्यात त्यांनी विधिवत शिकाऊ परवाना मिळवला, रिक्षा चालवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि आज अधिकाऱ्यांच्या समोर तीनचाकी रिक्षा चाचणी यशस्वीपणे पूर्ण केली. त्यांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली असून आठ दिवसांत त्यांना मूळ परवाना प्रत मिळणार आहे.
अशिक्षितता, वयोमान आणि सामाजिक बंधनांवर विजय
ग्रामीण पार्श्वभूमी, वयोमान, स्त्रीत्व, आणि शिक्षणाची मर्यादा या सगळ्या अडथळ्यांवर मात करून मंगल आवळेंनी सिद्ध केलं की, चिकाटी आणि आत्मविश्वास असेल तर, कोणतीही गोष्ट अशक्य नाही. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करावा, असा त्यांचा जिद्दी प्रवास प्रत्येक प्रवासी, नागरिकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
“मंगल आवळे या ६५ वर्षीय आजीबाईंनी शासनाचे नियम पाळून वाहन चालवण्याचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. त्यांची ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. 'मला जमलं, तर इतरांनाही जमायला हवं!' हा त्यांचा संदेश प्रत्येक वाहनचालकाने लक्षात ठेवावा." - चैतन्य कणसे (मोटार वाहन निरीक्षक, कराड)