महाबळेश्वर नगरपालिका हददीत पर्यावरणाला धोका
उच्च न्यायालयाच्या आदेशाला केराची टोपली दाखवत जंगलात सोडले मैलापाणी दोषीवर कारवाई करा - सुर्यकांत पांचाळ, पर्यावरण प्रेमी
मेढा : यंदाच्या पावसाळी हंगामाच्या सुरुवातीलाच महाबळेश्वर सारख्या भारत सरकारच्या केंद्रीय पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील पर्यटन स्थळी मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील सेक्टर दोन मधील प्रसिद्ध 'हॉटेल रिगल' या शासकीय भाडेपट्टा मिळकती लगत रहदारीच्या रस्त्याचे कडेला जंगलात नैसर्गिक पाण्याच्या ओढ्यात थेट मैलायुक्त प्रदूषित सांडपाणी सोडले जात असल्याने परिसरात प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. या गंभीर प्रकारामुळे नागरिक पर्यटकांना येता जाता दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे तसेच जंगलातील वन्यजीवांचे आरोग्य धोक्यात आले असून स्थानिक नगरपालिका प्रशासन, वन विभाग यांचे कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील सेक्टर दोनमध्ये, मधुसागर मधोत्पादक सहकारी संस्थेच्या जवळच हॉटेल रिगल आहे. या हॉटेलच्या कंपाऊंडबाहेर वाहतुकीच्या रस्त्यालगत असलेल्या वनक्षेत्रातून एक नैसर्गिक पाण्याचा ओढा वाहतो पावसाळी वातावरणाचा फायदा घेत याच ओढ्यामध्ये मैलामिश्रित सांडपाणी राजरोसपणे सोडले जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून, येथून जाणाऱ्या पर्यटक, नागरिकांना नाकाला रुमाल लावून प्रवास करावा लागत आहे.
विशेष म्हणजे, महाबळेश्वर या पर्यटन स्थळावरील सांडपाणी आणि मैलामिश्रित पाण्याच्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी माननीय मुंबई उच्च न्यायालयाने कठोर निर्देश दिलेले आहेत. या आदेशानुसार, नैसर्गिक जलस्रोतांमध्ये प्रदूषण करणे हा गंभीर गुन्हा आहे. असे असतानाही, हॉटेल रिगलचे नजीक रहदारीच्या रस्त्या लगतच्या जंगलात उघडपणे प्रदूषित मैला मिश्रीत पाणी जंगलातील नैसर्गिक स्रोतात सोडून न्यायालयाच्या आदेशाचा अवमान केला जात असल्याचे चित्र दिसत आहे.
"ही अत्यंत गंभीर बाब आहे. एका बाजूला न्यायालय पर्यावरणाच्या रक्षणासाठी आदेश देत आहे, तर दुसरीकडे पर्यावरणाचे धिंडवडे काढले जात आहेत. स्थानिक महाबळेश्वर नगरपालिका, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच शासकीय वन विभाग या शासकीय यंत्रणांकडून यावर कोणतीही कारवाई केली जात नाही, ही खेदाची बाब आहे नैसर्गिक अधिवासाला आणि वन्यजीवांना हानी पोहोचवणाऱ्यां विरोधात आम्ही गप्प बसणार नाही. याप्रकरणी आम्ही वरिष्ठ न्यायालयीन आणि शासकीय स्तरावर रीतसर तक्रार दाखल करून दोषी आढळणाऱ्या हॉटेलवर आणि कर्तव्यात कसूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी" - सूर्यकांत पांचाळ, पर्यावरणप्रेमी महाबळेश्वर
00000000000000000