धर्म आणि परंपरांच्या जोखडांनी आवळून ज्ञानापासून वंचित ठेवल्या गेलेल्या दलित समाजात जन्माला येऊनही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्ञानाची कास धरून केवळ देशातच नव्हे तर जगभरात सन्मानाचे स्थान प्राप्त केले. केवळ व्यक्तिगत उन्नतीवर समाधानी न राहता त्यांनी आपल्या वंचित समाजाच्या पुनरुत्थानासाठी आयुष्यभर कसून प्रयत्न केले.
आपल्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडीअडचणींपासून ते अखिल मानव जातीला भेडसावणाऱ्या कोणत्याही समस्येपर्यंत तात्पुरती मलमपट्टी करून आली वेळ मारून देणे, ही मानवी प्रवृत्ती असल्याचे सर्वसामान्यपणे दिसून येते. महामानवांच्या ठाई असणारे वेगळेपण यातच दिसून येते की ते तात्पुरती मरणपट्टी न करता समस्येच्या मुळाशी जाऊन ती मुळापासून उखडून टाकण्यासाठी सर्वस्व पणाला लावतात.
मानव जातीच्या दुःखाचे मूळ शोधून काढण्यासाठी गौतम बुद्धांनी उभे आयुष्य वेचले. स्वतः राजपुत्र असूनही सर्व भौतिक सुखांचा त्याग करून त्यांनी अंतिम सत्याच्या शोधासाठी खडतर जीवनाला सामोरे जाण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी तत्कालीन धार्मिक, तात्विक, अध्यात्मिक विचारसरणीच्या सर्व धुरिणाशी चर्चा करून त्यांच्या विचारांचा मागवा घेतला. कोणत्याच विचारसरणीने त्यांच्या मनातील मूलभूत शंकांचे निरसन न झाल्यामुळे गौतम बुद्धांनी ध्यानमार्गाची काळ धरून स्वतःच स्वतःच्या शंकांची उत्तरे शोधली.
त्यानंतर स्वतःच्या आध्यात्मिक उन्नतीच्या मस्तीत मश्गूल न रहाता अखिल मानवजातीच्या कल्याणाचा वसा घेऊन ज्ञानाची ज्योत सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली. या अथक प्रयत्नानंतरही त्यांनी आपली विचारसरणी लोकांवर लादली नाही. आपल्या पक्षात गुरुपरंपरा अथवा 'गादी' निर्माण केली नाही. उलट माझ्या शब्दांवर अथवा विचारांवर आंधळेपणाने विश्वास न ठेवता, कोणत्याही गुरु अथवा ग्रंथाचे अनुकरण न करता 'अत्त दीप भव' अर्थात तूच तुझा दिवा हो, मार्गदर्शक हो आणि आपला मार्ग तूच शोध, असा मोलाचा सल्ला समाजाला दिला.
हाच मार्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पुढे चालवला. आपल्या समाजाच्या पिचलेपणाचे कारण शोधताना त्यांना लक्षात आले की, हिंदू धर्मात पिढ्यानपिढ्या जाणीवपूर्वक रुजविल्या गेलेल्या बुरसटलेल्या विचारांमध्ये त्याचे मूळ आहे. दैववाद, उच्चनीचता, अस्पृश्यता यामुळेच दलित समाजाला विधानपिढ्या ज्ञानापासून आणि सर्वांगीण समृद्धी पासून दूर ठेवण्यात आले, हे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे या अन्यायाचे मूळ असणारा धर्म नाकारल्याखेरीस समाजाची प्रगती होणार नाही हे त्यांनी जाणले आणि त्यांनी, 'मी हिंदू म्हणून जन्माला आलो असलो तरीही हिंदू म्हणून मरणार नाही,' अशी घोषणा करीत त्या धर्माचा त्याग केला.
त्यावेळी संपूर्ण देशाभरावर प्रभाव असणाऱ्या महात्मा गांधीसह अनेक नेत्यांनी आणि समाजधुरिणांनी बाबासाहेबांना कसून विरोध केला. 'धर्म म्हणजे मनात आल्यावर काढून टाकण्यास अंगावरचा सदरा नव्हे, असे महात्माजींचे उद्गार होते. समाजाच्या उन्नतीसाठी धर्माचा त्याग करण्यापेक्षा धर्म सुधारण्याचा मार्ग अंगीकारावा, अशी त्यांची अपेक्षा होती. मात्र डॉक्टर आंबेडकर यांना हा उपाय पुरेसा वाटत नव्हता.
अर्थात, भारतीय समाजावर असलेला हजारो वर्षांचा धर्माचा पगडा लक्षात घेता धर्माची आवश्यकताही त्यांना मान्य होती. त्यामुळे त्यांनी हिंदू धर्माचा त्याग केल्यानंतर आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धर्मात प्रवेश केला. त्यासाठीही त्यांनी तब्बल वीस वर्षाचा कालावधी घेतला आणि पूर्ण विचारांती आणि अभ्यासांती बौद्ध धर्माची निवड केली. इतर सर्व प्रस्थापित धर्मांचा सारासार अभ्यास करून बौद्ध धर्म हा सर्वाधिक वैज्ञानिक आणि बुद्धिप्रामाण्यवादी धर्म असल्याचे निष्कर्षापर्यंत आल्यानंतरच त्यांनी या धर्माची निवड केली. एकेकाळी केवळ भारतातच नव्हे तर जगाच्या निम्म्याहून अधिक भूभागावर प्रभाव असलेला बौद्ध धर्म कालांतराने लुप्त झाला. डॉक्टर आंबेडकर यांनी त्याचे पुनरुत्थान केले.
समाजाची धारणा करण्यासाठी धर्म ही संकल्पना अस्तित्वात आली. रानटी टोळ्यांपासून उत्क्रांत होऊ लागलेल्या मानवी समाजात दीर्घकाळ धर्माचे नियम हेच नीतीनियम होते आणि कायदे कानूनही होते. समाज नियमानाचा गाडा धार्मिक नियमांच्या चाकांवर चालू होता. स्वातंत्र्योत्तर काळात त भारताने लोकशाही राज्यव्यवस्थेचा अंगीकार केल्यानंतर या देशाच्या नियमानासाठी घटना बनविण्याची जबाबदारी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर येऊन पडली. त्यांनी मोठे कर्तृत्व दाखवून जगातील सर्वोत्कृष्ट संविधानांपैकी एक संविधान भारताला प्रदान केले. आता समाजाला नियंत्रित करणाऱ्या नव्या साधनांचा वापर सुरू झाल्यावर धर्माला आपल्या जीवनात किती आणि कोणत्या उद्दिष्टांसाठी स्थान द्यायचे याचा विचार समाजाने करणे आवश्यक बनले आहे.