- संपादकीय
- परिवारवादाचा पुन्हा सूर!
परिवारवादाचा पुन्हा सूर!
बिहार विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन दिवसांच्या दौऱ्यात परिवारवादावर टीका केली. भाजपच्या कार्यकर्त्यांना परिवारवादाचा त्याग करण्याचा सल्ला त्यांनी दिला; परंतु इतर पक्षाच्या नेत्यांवर परिवारवाद आणि घराणेशाहीची टीका करणाऱ्या मोदी यांना स्वपक्षातील परिवारवाद दिसत नाही का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
भागा वरखडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप नेत्यांना घराणेशाहीचे राजकारण कायमचे सोडून देण्याचा सल्ला दिला आहे आणि राजकारणातील संरजामदारी संपली पाहिजे असे म्हटले आहे. भाजप नेत्यांना हा सल्ला देऊन मोदी यांनी सर्व राजकीय विरोधकांना अडचणीत टाकले आहे. त्याचबरोबर त्यांनी स्वकीयांचीही अडचण केली आहे. आतापर्यंत अशा गोष्टी फक्त काँग्रेस आणि अशा सर्व प्रादेशिक पक्षांसाठीच मोदी बोलत होते. आता त्यांनी थेट भाजप नेत्यांना त्याग करण्याचे आवाहन केले आहे. २०२० च्या बिहार विधानसभा निवडणुकीत मोदी यांनी राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांना ‘जंगल राज’चे युवराज म्हणून संबोधले होते. २०२१ मध्ये भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी पश्चिम बंगालमध्ये अभिषेक बॅनर्जी यांना राजकुमार म्हणत त्यांच्यावर टीका केली. २०२३ मध्ये मोदी यांनी तेलंगणातील घराणेशाहीच्या राजकारणासाठी ‘बीआरएस’ नेते के. चंद्रशेखर राव यांच्यावर हल्ला केला, तेव्हा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही त्याच शैलीत लक्ष्य करून सर्वांना आश्चर्यचकित केले. राहुल यांना सुरुवातीपासूनच मोदी आणि भाजप नेते ‘युवराज’ म्हणत त्यांची खिल्ली उडवली. आतापर्यंत मोदी यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला घराणेशाहीच्या राजकारणासाठी लक्ष्य केले आहे. विरोधकांनी भाजपमधील नेत्यांच्या मुलांना, मुलींना आणि कुटुंबातील सदस्यांना दिलेल्या तिकिटांकडे लक्ष वेधले आहे; परंतु उशीर झाला, तरी मोदी यांनी भाजप नेत्यांना त्याग करून एक आदर्श निर्माण करण्याचा सल्ला दिला आहे. मोदी यांनी भाजप नेत्यांना बजावले आहे, की राजकारणातील सरंजामीनदारी व्यवस्था संपली पाहिजे आणि राजकारणात घराणेशाहीला वाव नसावा. मोदी यांचे हे तत्त्वज्ञान चांगले असले, तरी इतरांना सल्ला देण्याअगोदर त्याची सुरुवात स्वतःपासून करायची असते, हे त्यांना माहीत नसावे.‘आधी केले मग सांगितले’या तत्त्वाला लोक अनुसरतात; परंतु मोदी यांनी माहीत असतानाही पक्षात उमेदवारी देताना त्यांच्याच सल्ल्याचे पालन केले नाही. कदाचित सरकार वेगळे आणि पक्ष वेगळा, पक्षाचा निर्णय मी घेत नाही, अध्यक्ष घेतात, असे सांगण्याची पळवाट त्यांनी निवडली असावी. भारतीय जनता पक्ष अनेक दशकांपासून घराणेशाहीविरुद्ध आवाज उठवत असला, तरी आता दुसऱ्या-तिसऱ्या पिढीत भाजपतही घराणेशाही आली आहे. अलिकडच्या काळात, भारतीय जनता पक्षाने अनेक राजकीय कुटुंबातील नेत्यांना लोकसभेची तिकिटे दिली आहेत. भाजप एकीकडे घराणेशाहीवर टीका करीत असला, तरी कुटुंबप्रधान पक्षांशी भाजपने घरोबा केला आहे.
भाजप सदस्यांमध्ये काँग्रेस आणि विरोधी पक्षांचे पंतप्रधान राहिलेल्या नेत्यांच्या कुटुंबांचा समावेश आहे. देशातील तीन राज्यांमध्ये भाजपने घराणेशाही असलेल्या पक्षांशी निवडणूकपूर्व युती केली होती. भाजपने पक्षवाढीसाठी इतर पक्षातील नेत्यांना सामावून घेताना त्यांच्या घराणेशाहीलाही सामावून घेतले. काँग्रेसच्या काळात वरिष्ठ मंत्री असलेल्या नेत्यांची कुटुंबे आज भाजपचे सदस्य आहेत. पाच वर्षांपूर्वीपर्यंत, जेव्हा भाजप घराणेशाहीवर हल्ला करायचा, तेव्हा विरोधी पक्ष वसुंधराराजे, राजनाथ सिंह, बी. एस. येदियुरप्पा कुटुंब, विजयसिंह मोहिते पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, गोपीनाथ मुंडे, एकनाथ खडसे, अनुराग ठाकूर यांची नावे घेऊन प्रत्युत्तर द्यायचे. भाजपमध्ये एकाच कुटुंबातील काही मोजकेच नेते होते. नरेंद्र मोदी सरकारचा दुसरा कार्यकाळ सुरू झाल्यानंतर, काँग्रेससह इतर पक्षांमधून नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा टप्पा सुरू झाला. यामध्ये ज्योतिरादित्य शिंदे, सुनील जाखड, कॅप्टन अमरिंदर सिंग आणि जितिन प्रसाद यांसारख्या नेत्यांना भाजपत आणण्यात आले. भाजपमध्ये सामील झालेल्यांमध्ये असे अनेक नेते आहेत, ज्यांचे कुटुंब बऱ्याच काळापासून राजकारणात आहे. उत्तरेकडून दक्षिणेकडे भाजपमध्ये सामील होणाऱ्या अशा नेत्यांची यादी मोठी आहे. यापैकी बहुतेक नेते काँग्रेसमध्ये होते. माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांची कुटुंबे भाजपमध्ये दिसत आहे. भारतीय जनता पक्षाने बिहार, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशमध्ये दोन्ही हात पसरून कुटुंबाभिमुख पक्षांशी युती केली आहे. मोदी आणि भाजप नेते नेहमीच कुटुंबाभिमुख प्रादेशिक पक्षांना आणि काँग्रेसला लक्ष्य करत होते. आता त्यांच्याच पक्षाचे काँग्रेसीकरण होत असताना मोदी यांनी घराणेशाही, संरजामशाहीचा त्याग करण्याचा सल्ला द्यावा, हा अलिकडच्या काळातील सर्वांत मोठा विनोद आहे. राजकीय कुटुंबातील राजकारणी भाजपचे सदस्य होत आहेत. काँग्रेस सोडलेले आरपीएन सिंह आणि अशोक चव्हाण यांना राज्यसभेत पाठवण्यात आले. हे दोन्ही नेते त्यांच्या कुटुंबाचा राजकीय वारसा सांभाळत आहेत. काँग्रेस नेते जितेंद्र प्रसाद यांचे पुत्र जतिन प्रसाद उत्तर प्रदेश सरकारमध्ये मंत्री झाले, आता ते सुलतानपूर येथून लोकसभेचे खासदार आहेत. अशोक चव्हाण यांनी मुलीला राजकारणात आणले. त्यांचे मेहुणे राजकारणात आहेत. हरियाणात, देवीलाल यांची घराणेशाही भाजपला चालते. माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य भाजपमध्ये आहेत. सिद्धार्थ नाथ सिंह हे आंध्र प्रदेशात भाजपचे सह-निवडणूक प्रभारी आहेत. शास्त्रीजींचे नातू विभाकर आणि नातू अशोक शास्त्री हेदेखील भाजप नेते आहेत. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र नीरज शेखर हे भाजपचे राज्यसभेचे खासदार आहेत. आता आणखी एक माजी पंतप्रधान नरसिंह राव यांचे पुत्र प्रभाकर राव भारतीय जनता पक्षाचे सदस्य झाले आहेत. याशिवाय, एनटी रामाराव यांची मुलगी डी पुरंदेश्वरी आता आंध्र प्रदेशची कमान सांभाळत आहेत. रामाराव यांचे संपूर्ण कुटुंब राजकारणाशी जोडलेले आहे. आंध्र, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशने कुटुंबाभिमुख मित्रपक्षांसोबत युती केली.
महाराष्ट्रात काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री शिवराज पाटील यांच्या सून अर्चना पाटील चाकूरकर यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचे नातू रवनीत बिट्टू, कॅप्टन अमरिंदर यांच्या पत्नी प्रणीत कौर, काँग्रेस नेते प्रताप सिंग बाजवा यांचे भाऊ फतेह जंग बाजवा यांनीही भाजपत स्थान मिळवले. भाजपने कुटुंबीय पक्षांसोबत निवडणूक युती केली आहे. उत्तर प्रदेशमध्ये, त्यांनी चौधरी चरण सिंग यांच्या कुटुंबातील जयंत सिंग, सोनेलाल पटेल यांच्या वारस अनुप्रिया पटेल, सुभास्पा आणि निषाद पक्षासोबत युती केली आहे. कर्नाटकमध्ये माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांच्या धर्मनिरपेक्ष जनता दलासोबत भाजपने युती केली आणि त्यांच्या उमेदवारांचा प्रचार मोदी यांनी केला. एकाच घरात अनेक जणांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपवर त्यांचे समर्थन करण्याची वेळ आली आहे. बिहारमध्ये माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचा हिंदुस्तान अवामी मोर्चाशी भाजपची युती आहे. हरियाणामध्ये, भाजपचे चौधरी देवीलाल यांचे नातू दुष्यंत चौटाला यांच्याशी दीर्घकाळ संबंध होते. आंध्र प्रदेशात तेलुगू देसम पक्षावर कुटुंबवादाचा आरोप आहे. त्यांच्यासोबत भाजप आंध्र प्रदेशच्या सरकारमध्ये सहभागी आहे आणि तेलुगु देसम केंद्राच्या सत्तेत सहभागी आहे. तामिळनाडूमध्ये ज्या पक्षासोबत भाजपने युती केली, त्या पक्षाचाही इतिहासही कुटुंबवादाचाच आहे. महाराष्ट्रात अजित पवार यांच्या पक्षातही घराणेशाही आणि संरजामवाद आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध असतानाही भाजपला त्यांचे समर्थन करावे लागले. शिवसेनेच्या शिंदे गटाची अवस्था वेगळी नाही. त्यांचा पक्षही परिवारवादाचा पुरस्कर्ता आहे. राज्यसभा आणि विधान परिषदेच्या अंकगणितानुसार, भाजपमध्ये समायोजनाची शक्यता जास्त आहे. या पक्षांतराचा आणखी एक पैलू आहे. गांधी घराण्याच्या वर्चस्वामुळे दुर्लक्षित राहिलेल्या काँग्रेसच्या कुटुंबातील सदस्यांना भाजप आता आलिंगन देत आहे. भाजपचा संदेश स्पष्ट आहे, की काँग्रेसने त्यांच्या सक्षम नेत्यांना बाजूला केले होते. आता भाजप त्यांचा आदर करत आहे. काँग्रेस कमकुवत झाली आहे; परंतु घराणेशाही आणि परिवारवादावर टीका करणाऱ्या भाजपतच मोठा परिवारवाद झाला आहे. भलेही भाजप त्याला निवडून येण्याचा निकष आणि गुणवत्ता मानत असेल; परंतु आताचे मोदी यांचे घराणेशाहीचा त्याग करण्याचे वक्तव्य म्हणजे म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हज’ या धाटणीतले आहे.
000