- देश-विदेश
- गिरे तो भी टांग उपर, पाक फील्ड मार्शलनी पुन्हा ओकली गरळ
गिरे तो भी टांग उपर, पाक फील्ड मार्शलनी पुन्हा ओकली गरळ
सिंधू जल करार स्थगितीवरून भारताला धमकवण्याचा केविलवाणा प्रयत्न
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
भारतीय सैन्याने पाकिस्तानला सडकून धोपटल्यावरही पाक लष्कर प्रमुख फील्ड मार्शल आसीम मुनीर यांचे डोके ताळ्यावर आलेले नाही. सिंधू जल कराराला स्थगिती देण्यावरून त्यांनी भारताला धमक्या देण्याचा केविलवाणा प्रयत्न केला आहे. पाकिस्तान दक्षिण आशियामध्ये भारताचे वर्चस्व कधीच खपवून घेणार नाही, अशी मल्लिनाथी त्यांनी केली आहे.
सिंधू नदीच्या पाण्यावर पाकिस्तानच्या २४ कोटी जनतेचा हक्क आहे. या हक्काचे उल्लंघन आम्ही सहन करणार नाही. सिंधू नदी ही आमची रक्तवाहिनी आहे. सिंधू नदीच्या पाण्यावरील हक्काबाबत कोणतीही तडजोड आम्ही स्वीकारणार नाही, अशी दर्पोक्ती पराभवानंतरही पदोन्नती घेणाऱ्या फील्ड मार्शल मुनीर यांनी केली आहे. पाकिस्तानी विद्यापीठांचे कुलगुरु, ज्येष्ठ प्राध्यापक, विविध क्षेत्रातील संशोधक, विचारवंत यांच्यासमोर ते बोलत होते.
पहलगाम हल्ल्यानंतर सर्वप्रथम भारताने सिंधू जल कराराला स्थगिती देण्याचे पाऊल उचलले. त्याचे परिणाम आता पाकिस्तानात दिसू लागले आहेत. या मुद्द्यावरून सिंध प्रांतातील जनता आपल्याच मंत्र्यांची घरे पेटवायला उठली आहे. पाकिस्तानातील पंजाब आणि सिंध या प्रांतातील तब्बल ८० टक्के शेती आणि जनजीवन सिंधू नदीच्या पाण्यावर अवलंबून आहे.