- देश-विदेश
- भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ
भारताशी वाटाघाटी करण्यासाठी पाकिस्तान उतावीळ
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पुढाकार घेण्याची घातली गळ
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
ऑपरेशन सिंदूर दरम्यान सडकून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तानला धडकी भरली आहे. भारताने पुन्हा एकदा चढाई करून पाकिस्तानची उरली सुरली लाज देखील काढू नये, यासाठी पाकिस्तानी भारताबरोबर सर्व द्विपक्षीय समस्यांबाबत चर्चा करण्याचा धोशा काढला आहे. सीमेपलीकडून दहशतवादाला पोसणे थांबल्याशिवाय चर्चा होणार नाही, या भूमिकेवर ठाम असलेल्या भारताला चर्चेसाठी तयार करावे, अशी गळ पाकिस्तानकडून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना घातली जात आहे. त्यासाठी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ हे ट्रम्प यांच्यावर स्तुतिसुमने उधळत आहेत.
मागील काही काळापासून पाकिस्तानमध्ये आर्थिक आणीबाणीची परिस्थिती उद्भवली आहे. त्यातच तहरीक ए तालिबान पाकिस्तान पाकिस्तानी सैन्याला रोज ठोकत आहे. स्वतंत्र बलुचिस्तानच्या मागणीसाठी तेथील जनता रस्त्यावर उतरून आंदोलने करीत आहे. त्याचप्रमाणे त्यांच्या बलोच लिबरेशन आर्मी या सशस्त्र संघटनेकडून पाक सैन्यावर वारंवार हल्ले होत असून त्यांनी बलुचिस्तानातील मोठ्या भूभागावर नियंत्रण देखील प्राप्त केले आहे. सिंध मधील जनतेतही सैन्य आणि सत्ताधारी यांच्या बद्दल तीव्र नाराजी असून सिंधी लोकही रस्त्यावर उतरले आहेत.
देशात अराजकाची परिस्थिती असताना देखील पाक सैन्य आणि त्यांची गुप्तहेर संघटना आयएसआयने काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला घडवून आणला. भारताने ऑपरेशन सिंदूर च्या माध्यमातून पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला. पाकव्याप्त जम्मू-काश्मीर आणि खुद्द पाकिस्तानातील दहशतवादी तळांबरोबरच पाक सैन्याचे हवाई तळ उध्वस्त केले. भारताची क्षेपणास्त्र पाकिस्तानी अणुबॉम्ब साठ्याच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचल्याने पाकिस्तानचे अवसान गळून गेले आहे.
दुसरीकडे भारताने सिंधू नदीचे पाणी रोखून पाकिस्तानवर वॉटर बॉम्ब देखील डागला आहे. त्यामुळे पाणीटंचाईने पाकिस्तानच्या नाकी नऊ आले आहेत. हवाई, सागरी आणि रस्त्यावरील मार्गांनी वाहतूक रोखल्यामुळे पाकिस्तानचा व्यापार ठप्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तान भारताची चर्चा करण्यासाठी गयावया करीत आहे. ट्रम्प यांनी भारताला चर्चेसाठी तयार करावे, यासाठी पाकिस्तानचे माजी मंत्री बिलावल भुट्टो झरदारी वॉशिंग्टनमध्ये तळ ठोकून बसले आहेत. शाहबाज शरीफ हे देखील अमेरिकेच्या दुतावासात जाऊन ट्रम्प यांचे गुणगान गात आहेत. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय वादामध्ये तिसऱ्या देशाची मध्यस्थी नको, या भूमिकेवर भारत ठाम आहे. त्याचप्रमाणे दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकणार नाही, हे देखील भारताने पाकिस्तानला वारंवार सुनावले आहे.