- देश-विदेश
- 'गाजा आणि इराण हल्ल्यावरील भारत सरकारचे मौन अयोग्य'
'गाजा आणि इराण हल्ल्यावरील भारत सरकारचे मौन अयोग्य'
काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांची टीका
नवी दिल्ली: प्रतिनिधी
गाझापट्टी आणि इराण या ठिकाणी इस्रायलने केलेला अमानुष हल्ला निंदनीय असून त्याबाबत भारत सरकारने मौन बाळगणे आणि कोणतीही भूमिका न देणे अयोग्य असल्याची टीका काँग्रेसच्या सर्वोच्च नेत्या सोनिया गांधी यांनी केली आहे.
जगाला 13 जून रोजी पुन्हा एकदा सैन्यबळावर केल्या जाणाऱ्या दडपशाहीचे विदारक चित्र दिसून आले आहे. इराणच्या सार्वभौमत्वावर इस्रायलने बेकायदेशीरपणे आणि निर्दयपणे घाला घातला आहे. त्याचे विपरीत परिणाम केवळ प्रादेशिक नव्हे तर वैश्विक पातळीवर दिसून येणार आहेत, असा इशारा गांधी यांनी दिला.
काही काळापूर्वी इस्रायलने अत्यंत क्रूर आणि असमर्थनीय हल्ले करून गाझापट्टीचा नायनाट केला. सध्या देखील इस्रायलच्या कारवाया निष्पाप नागरिकांच्या जीवावर उठणाऱ्या आणि प्रादेशिक शांतता धोक्यात आणणाऱ्या ठरल्या आहेत, अशी टीका गांधी यांनी केली.
अमेरिका आणि इराण यांच्यामध्ये राजनैतिक संवादाची घोषणा करण्यात आली होती. याच वर्षात पाच बैठका पार पडल्या होत्या आणि सहावी बैठक याच महिन्यात पार पडणार होती. इराण सध्या अण्वस्त्र निर्मितीचा प्रयत्न करीत नसल्याचा स्पष्ट निर्वाळा अमेरिकन काँग्रेसमध्ये देण्यात आला आहे. इराणने सन 2003 नंतर अण्वस्त्र निर्मिती कार्यक्रम बंद केला आणि त्यानंतर इराणचे सर्वेसर्वा आयातुल्ला खोमेनी यांनी त्याला परवानगी दिलेली नाही. या पार्श्वभूमीवर इस्रायलने केलेल्या हल्ल्याचे कोणत्याही परिस्थितीत समर्थन होऊ शकत नाही, असे गांधी यांनी नमूद केले.