- राज्य
- उत्तराखंड मधील ढगफुटी पुण्याचे 19 जण बेपत्ता
उत्तराखंड मधील ढगफुटी पुण्याचे 19 जण बेपत्ता
काल दुपारपासून संपर्क तुटला
पुणे: प्रतिनिधी
उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटीनंतर धारली हे गावच नष्ट झाले. याच परिसरात पर्यटनासाठी गेलेले पुण्यातील 19 जून बेपत्ता असून त्यांच्याशी संपर्क होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या नातेवाईकांच्या काळजाचा ठोका चुकला आहे. त्यांच्याप्रमाणेच सोलापूर येथील चार जण बेपत्ता असून नांदेडहून गेलेले अकरा पर्यटक उत्तरकाशी येथे सुरक्षित असल्याची माहिती मिळत आहे.
आंबेगाव य तालुक्यातील अवसरी खुर्द या गावातील शाळेचे सन 1990 मध्ये दहावीच्या वर्गात असलेले आठ पुरुष आणि 11 महिला यांचा समूह पर्यटनासाठी उत्तराखंड येथे गेला होता. काल सकाळपर्यंत ते आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होते. मात्र त्यानंतर त्यांचा संपर्क तुटला आहे. ज्या भागात ढगफुटी झाली त्याच भागात हा समूह असल्याने त्यांच्या कुटुंबीयांच्या काळजीत भर पडत आहे उत्तराखंड पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग या समूहाचा शोध घेत आहेत.
सोलापूर येथील विठ्ठल पुजारी, समर्थ दसरे, धनराज बगले, मल्हारी धोटे असे चौघेजण पर्यटनासाठी गंगोत्री येथे गेले होते. त्यांचादेखील कालपासून संपर्क होऊ शकत नाही. मात्र, सोलापूर जिल्हा प्रशासनाने गंगोत्री प्रशासनाशी संपर्क साधला असून पुरामध्ये मरण पावलेल्या अथवा जखमी झालेल्या लोकांमध्ये सोलापूरच्या कोणत्याही नागरिकाचा समावेश नाही, असे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे या युवकांच्या कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
नांदेड येथील अकरा पर्यटक उत्तरकाशी जवळ खराडी या गावात सुखरूप आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याशी संपर्क साधला आहे. काल ढगफुटीची घटना घडली त्यावेळी या 11 जणांमध्ये फाटाफूट झाली होती. मात्र, आज ते एकत्र आले आहेत.