Solapur News | झेडपी सीईओच्या पीएला कार्यमुक्त करा!
कर्मचाऱ्यांची मागणी : बदल्यामुळे झेडपीत गर्दी फुलली
सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने - देशमुख यांना कार्यमुक्त करण्याची मागणी होत आहे. दरम्यान शुक्रवारी सीईओ जंगम यांनी आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या प्रशासकीय व विनंती बदल्या केल्यामुळे झेडपीत कर्मचाऱ्यांची गर्दी फुलली होती.
सीईओ जंगम यांचे स्वीय सहायक सुधाकर माने - देशमुख यांची
अक्कलकोटला बदली झाली आहे. अशात मुख्य कार्यकारी जंगम यांनी पाच वर्षाहून अधिक काळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश दिले आहेत.त्यामुळे पहिल्यांदा सीईओ यांचे स्वीय सहाय्यक सुधाकर माने- देशमुख यांना कार्यमुक्त करावे, अशा मागणीला जोर धरला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या आदेशानुसार 30 व 31 मे रोजी ग्रामपंचायत, आरोग्य आणि पंचायत समितीमधील कर्मचाऱ्यांच्या विनंती व प्रशासकीय बदल्या करण्यात येत आहेत. दरम्यान नर्सेस संघटनेच्या सुप्रिया जगताप यांनी आरोग्याचे प्रशासन अधिकारी नागेश पाटील यांच्या कार्यपद्धतीवर थेट आरोप केला आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेचे महेश जाधव यांचा पंढरपूर पंचायत समितीमधील कालावधी जास्त झालेला असतानाही कमी दाखवण्यात आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. असे अनेक कर्मचाऱ्यांच्याबाबतीत घडले आहे. बदलीतून सुटका करून घेण्यासाठी नियमाचा आधार घेत असे अनेकजण पदाला चिटकून बसले असल्याचे सांगितले जात आहे.
स्वीय सहाय्यकावर रोष...
जिल्हा परिषदेत घडलेल्या अनेक प्रकारातूनच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे स्वीय सहाय्यक असलेले सुधाकर माने- देशमुख यांच्यावर आता आरोप होत आहे. वास्तविक सीईओकडे नदाफ व मल्लिकार्जुन तलवार हे दोन कार्यालयीन कामकाज करणारे दोन कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांवर ही जबाबदारी दिली तर सीईओचे कामकाज जनव्यापक होईल, अशी कर्मचाऱ्यांमध्ये चर्चा आहे. तत्कालीन सीईओ आव्हाळे यांच्या कालावधीत देशमुख यांची नियुक्ती झाली. त्यावेळीच ते वादग्रस्त ठरले होते. यावेळी देशमुख यांनी स्वेच्छा निवृत्तीचा अर्ज दिला होता अशी चर्चा आहे. त्यामुळे आव्हाळे यांनी थोडे दिवस कामकाज पाहू असे म्हणून वेळ ढकलली. पण देशमुख यांच्या स्वेच्छा निवृत्तीचे काय झाले? असा सवाल कर्मचाऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. त्यानंतर सीईओ म्हणून जंगम यांनी पदभार घेतला. या काळात अनेक गंभीर तक्रारी आल्या.
फायली होत आहेत गायब...
शासनाच्या आदेशानंतर सीईओ जंगम यांनी ई-फायलिंग सिस्टीम सुरु केली आहे. पण तरीही चक्क सीईओकडे येणाऱ्या फायली गायब होत असलेल्या तक्रारी आल्या आहेत. या फायली कोण गायब करीत आहे याचा शोध घ्यावा अशी मागणी होत आहे. सीईओ कार्यालयातील महत्त्वाची माहिती बाहेर जाते. सार्वजनिक ठिकाणी ही माहिती कोणाकडून बाहेर जात आहे याचा शोध घ्यावा अशीही मागणी कर्मचाऱ्यातून केली जात आहे.
शिक्षण विभागावर नजर
माध्यमिक शिक्षण विभागात कर्मचाऱ्यांची वाणवा आहे. शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी मागणी करून ही कर्मचारी दिले जात नाहीत. या विभागाला नवे कर्मचारी देण्यास खोडा घातला जात आहे. असा प्रकार कोण करत आहे तसेच या विभागात काम करणाऱ्या वादग्रस्त कर्मचाऱ्यांना वरदहस्त कोणाचा? हाही विषय संशोधनाचा झाला आहे. वादग्रस्त कर्मचाऱ्यांशी लांगेबांदे कोणाचे आहेत, वरिष्ठांच्या नावाने “लक्ष्मी’ दर्शनाचा आधार घेणाऱ्याचा सीईओ जंगम यांनी बंदोबस्त करावा नाही तर भविष्यात अडचणी वाढणार आहेत, असे कर्मचाऱ्यांमध्ये खुलेपणाने बोलले जात आहे.
सीईओ कुलदीप जंगम यांनी आपल्या कार्याची झलक दाखवत पाच वर्षापासून अधिक कालावधी झालेल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेची सुरुवात त्यांनी स्वतःच्या स्वीय सहाय्यकापासून करावी याही चर्चेला जोर धरला आहे.
000