- राज्य
- 'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समूहांना...'
'मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यापेक्षा दोन समूहांना...'
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला मोठा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
महाविकास आघाडीला मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यापेक्षा दोन समाजसमूहांना एकमेकात झुंजवत ठेऊन राजकारण करायचे आहे, असा मोठा आरोप भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी समाजमाध्यमातून केला आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाद्वारे त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून कोणी मतांची बेगमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. ही नामुष्की टाळण्यासाठी जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घ्यावे आणि सरकारला सहकार्य करावे, असे आवाहनही उपाध्ये यांनी केले आहे.
"ज्या समाजाने लाखोंचे यशस्वी मूक मोर्चे शांततेत काढले, तो हाच का मराठा समाज अशी शंका यावी असे चित्र गेले चार ते पाच दिवस मुंबईत सुरू आहे. छत्रपतींचा मावळा ही आपली ओळख पण आंदोलनातील हौशे गवश्यांनी जे केले ते प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. ‘ते आमचे नव्हेत’ असे म्हणून जबाबदारी झटकता येईल पण वस्तुस्थिती बदलणार नाही," असं उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले आहे.
मराठा समाजाच्या वेदना आपण नजरेस आणून दिल्यानंतर सरकारने १० टक्के आरक्षण देऊन सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. आपल्या बहुतेक मागण्या मान्य झाल्या आहेत. ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याबाबत भाजपची भूमिका स्पष्ट आहे. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याबाबत भाजप ठाम आहे, असे उपाध्ये यांनी स्पष्ट केले.
आज मराठा समाजाबाबत कळवळा दाखवणारे शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांना ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देणे मान्य आहे का, याची विचारणा करावी. ठाकरे यांना या विषयाची फारशी समज नसल्याने ते मूग गिळून गप्प बसतील. महाविकास आघाडीतील पक्ष याबाबत गोलगोल भूमिका घेत आहेत, अशी टीका उपाध्ये यांनी केली.
"प्रत्येक आंदोलन यशस्वी होण्यासाठी थोडे मागेपुढे करावे लागते. काही वेळा थांबावे लागते. महात्मा गांधीनी सुध्दा काही वेळा आंदोलन स्थगित केले. आता वेळ आहे थांबण्याची, असेही उपाध्ये म्हणाले.