- राज्य
- 'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...'
'एक तर मुंबईतून विजययात्रा निघेल किंवा माझी प्रेतयात्रा...'
मनोज जरांगे पाटील यांचा निर्वाणीचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
आपल्यासाठी नाही तर पुढच्या पिढीसाठी आरक्षण मिळवून डोक्यावर गुलाल घेण्याच्या निर्धाराने आपण इथे आलो आहोत. मुंबईतून एक तर मराठा आरक्षणाच्या लढ्याची विजय यात्रा निघेल किंवा आपली अंत्ययात्रा निघेल, असा निर्वाणीचा इशारा मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनासाठी आणखी एक दिवसाची मुदत वाढ काल पोलिसांकडून देण्यात आली. मात्र, आरक्षणाचा निर्णय झाल्याशिवाय मुंबईतून हरणार नाही, असा त्यांचा निर्धार आहे.
... तर नेते आपल्याशी संपर्क करण्यास घाबरतील
काल जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांना काही आंदोलकांनी घेराव घातला. त्यांच्या वाहनावर बाटल्याही फेकल्या. या घटनेबाबत प्रतिक्रिया देताना जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याकडे येणारा नेता कोणताही असो, आपल्या विचाराचा समर्थक असो की विरोधक असो, त्याला सन्मानाने येऊ द्या आणि सन्मानानेच जाऊ द्या. अन्यथा नेते आपल्याशी संपर्क करण्यास घाबरतील. आरक्षणाचा निर्णय होईपर्यंत धीर धरा. आरक्षण नाही मिळाले तर पुढे काय करायचे ते पाहू, असेही ते म्हणाले.
सरकारला घडवायची आहे दंगल
सुप्रिया सुळे यांना घेराव घालणारे, त्यांच्या गाडीवर बाटल्या फेकणारे लोक कोण आहेत ते आपल्याला माहिती करून घ्यावे लागेल. ते सरकारने पाठवलेले लोक आहेत का, ते बघावे लागेल. सत्ताधाऱ्यांना आंदोलन बदनाम करण्यासाठी दंगल घडवायची आहे. त्यामुळे ते अशी माणसं आंदोलनात घुसवू शकतात. त्यामुळे आपल्या लोकांनी कायम सावध राहणे गरजेचे आहे, असेही जरांगे पाटील म्हणाले.