- राज्य
- शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई
शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मिळणार नुकसान भरपाई
कृषिमंत्री दत्ता भरणे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सर्व शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी घोषणा कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी केली आहे. अती पावसामुळे राज्यात तब्बल 70 लाख एकर क्षेत्रावरील पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिकांबरोबरच माती देखील वाहून गेली आहे, अशी माहिती भरणे यांनी दिली.
राज्यात अति पावसामुळे सर्वाधिक नुकसान विदर्भात झाले आहे. त्या खालोखाल मराठवाडा येथे शेतकऱ्यांच्या नुकसान झाले आहे. अजूनही पाऊस सुरूच आहे. ज्या शेतकऱ्यांचे पंचनामे झाले आहेत त्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. इतरांचे पंचनामे वेगाने सुरू आहेत. राज्य आणि केंद्र सरकारच्या निकषानुसार शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात येईल, अशी ग्वाही भरणे यांनी दिली.
हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार आहे. आजच्या अडचणीच्या परिस्थितीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार परिस्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याच्या दृष्टीने मंत्रिमंडळ बैठकीत निश्चितपणे सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असेही भरणे यांनी सांगितले.