- राज्य
- '... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच'
'... म्हणून वाल्मीक कराडची दोषमुक्ती नाहीच'
काही निरीक्षणे नोंदवत मोका न्यायालयाने केले स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी वाल्मीक कराड हाच सूत्रधार असून तो गुन्हेगारी टोळीचा मोरक्या आहे, असे निरीक्षण नोंदवून संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा विशेष न्यायालयाने कराड याचा दोष मुक्तीचा अर्ज फेटाळून लावला आहे. या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे वाल्मिक याच्या वकिलांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नाही. त्यामुळे आपल्याला या प्रकरणात दोष मुक्त करावे, असा अर्ज वाल्मीक कराड यांनी वकिलांमार्फत न्यायालयाला केला होता. याबाबत न्यायालयाने काही गंभीर निरीक्षणे नोंदवली आहेत.
पवनचक्की कंपनीकडून खंडणी मागण्यात संतोष देशमुख आड आल्याने त्यांची हत्या करण्यात आली. या गुन्हेगारी टोळीचा प्रमुख वाल्मीक कराडच आहे. त्याच्या इशाऱ्यावरूनच अपहरण करून ही हत्या करण्यात आली.
वाल्मीक कराड याच्यावर वीस पेक्षा अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मागच्या दहा वर्षात अत्यंत गंभीर स्वरूपाचे दहा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत.
आवादा कंपनीच्या संचालकांना दिलेल्या धमक्या, अनेक साक्षीदारांच्या साक्षी, गोपनीय जबाब, डिजिटल पुरावे आणि न्यायवैद्यक पुरावे याच्या आधरावर वाल्मीक कराड याला संतोष देशमुख हत्याप्रकरणी दोष मुक्त करण्याचे नाकारण्यात येत असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे.