- राज्य
- वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी: देवेंद्र फडणवीस
वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी: देवेंद्र फडणवीस
सर्वच मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांकडून मिळाली कडक शब्दात समज
मुंबई: प्रतिनिधी
सध्या अनेक मंत्री आणि आमदार आपल्या बेछूट आणि बेताल वर्तन आणि विधानांनी टीकेचे लक्ष्य ठरले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळ बैठकीत संपताना सर्वच मंत्र्यांना कडक शब्दात समज दिली. सर्वांना आपले वर्तन सुधारण्यासाठी ही शेवटची संधी आहे. यापुढे विपरीत वर्तन घडल्यास आवश्यक असेल ती कारवाई करू, असा इशारा त्यांनी मंत्र्यांना दिला.
अधिवेशन काळात सभागृहात मोबाईलवर रमी खेळणारे माणिकराव कोकाटे, पैशाने भरलेल्या बॅगेसह व्हिडिओ प्रसिद्ध झालेली संजय शिरसाट, आईच्या नावाने कांदिवलीत डान्सबार असलेले योगेश कदम, यांच्यासह मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय गिरीश महाजन, असे अनेक मंत्री आणि कॅन्टीन कर्मचाऱ्याला मारहाण करणारे संजय गायकवाड यांच्यासारखे आमदारही वादग्रस्त ठरले आहेत. त्यामुळे केवळ त्यांची व्यक्तिगत नव्हे तर सरकारची बदनामी होत आहे, याची जाणीव फडणवीस यांनी सर्वच मंत्र्यांना करून दिली.
यापुढे कोणत्याही मंत्र्याचे एकही वादग्रस्त विधान आणि कृती खपवून घेतले जाणार नाही. अशा प्रकारांमुळे सरकारची प्रचंड बदनामी होत आहे. यापुढे कोणाचाही अशा प्रकारची एकही कृती खपवून घेतली जाणार नाही. असे प्रकार घडल्यास आवश्यक ती कारवाई करूच, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी सर्व मंत्र्यांना दिली.