- राज्य
- 'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'
'बाळासाहेब हा एकच ठाकरे ब्रँड, उद्धव नाही'
रामदास कदम यांचा हल्लाबोल
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्रात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब हे एकच ठाकरे ब्रँड आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांचा ब्रँड बनू शकतो. मात्र, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे कधीच ब्रँड बनू शकत नाहीत, अशा शब्दात शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टोला लगावला.
उद्धव ठाकरे अतिशय फसवा माणूस आहे. पोटात एक आणि ओठात एक, अशी त्यांची पद्धत आहे. त्यांना आपण अनेक वर्षापासून ओळखतो. राज ठाकरे यांच्याबरोबर युती करताना उद्धव ठाकरे काँग्रेसची कास सोडणार आहेत का? शरद पवार यांना दूर करणार का? बाळासाहेब ठाकरे यांची कडव्या हिंदुत्वाची भूमिका घेणार का? राज ठाकरे हे भोंग्यांच्या विरोधात अत्यंत कठोर पावले उचलणार आहेत. त्याला तुम्ही साथ देणार का, असे सवाल कदम यांनी उद्धव ठाकरे यांना केले आहेत.
राज आणि उद्धव ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. मात्र, हे एकत्रीकरण प्रत्यक्षात येण्याची शक्यता आपल्याला वाटत नाही. उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुलाला निवडणुकीच्या रिंगणात उतरवले त्यावेळी राज ठाकरे यांनी त्यांचे कौटुंबिक नाते निभावले. मात्र, राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांचा उद्धव यांनी पराभव केला. राज ठाकरे यांनी कौटुंबिक नात्यातून आदित्य ठाकरे यांना पाठिंबा दिला. मात्र, उद्धव ठाकरे हा मनाचा मोठेपणा दाखवू शकले नाहीत, असा टोला कदम यांनी लगावला.
बाळासाहेबांच्या विचारांना उद्धव यांच्याकडून काळीमा
उद्धव ठाकरे यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळीमा फासला आहे. ते केवळ बाळासाहेबांचे पुत्र आहेत. मात्र, मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसबरोबर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना काळीमा फासला आहे. त्याची पायमल्ली केली आहे. बाळासाहेबांनी आयुष्यभर काँग्रेसबरोबर संघर्ष केला. उद्धव ठाकरे यांनी केवळ पदासाठी त्यांचे विचार पायदळी तुडवले, असा आरोप कदम यांनी केला.
वैयक्तिक स्वार्थासाठी राज ठाकरे यांचा वापर
उद्धव ठाकरे यांना आपण अत्यंत जवळून ओळखतो. ते अत्यंत स्वार्थी आहेत. सध्या राजकारणात उद्धव ठाकरे यांची अवस्था फार वाईट झालेली आहे. या अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी त्यांना राज ठाकरे यांची आठवण झाली आहे. आपल्या फाटक्या राजकारणाला ठिगळ लावण्यासाठी राज ठाकरे यांचा वापर करून घेण्याची उद्धव ठाकरे यांची इच्छा आहे. केवळ वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांना राज यांची आठवण झाली आहे. या मध्ये राज ठाकरे यांच्याबद्दल कोणतेही प्रेम, आपुलकी अथवा ओलावा नाही, असा दावाही कदम यांनी केला.