- राज्य
- 'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच'
'कोणत्याही परिस्थितीत आळंदीत कत्तलखाना नाहीच'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली ग्वाही
पुणे: प्रतिनिधी
कोणत्याही परिस्थितीत वारकरी संप्रदायाचे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेल्या आळंदीत कत्तलखाना होऊ देणार नाही. आळंदीमध्ये कत्तलखान्यासाठी असलेले आरक्षण रद्द करण्याचे आदेश आपण स्वतः दिले आहेत, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आळंदीच्या विकास आराखड्यात कत्तल खाण्याचे आरक्षण नमूद करण्यात आले आहे. त्याबद्दल मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली असता त्यांनी आळंदीत कत्तलखाना सुरू केल्या जाणार नाही, अशी ग्वाही दिली.
महायुतीने दिलेले प्रत्येक आश्वासन पूर्ण केले जाईल, असा दावा करतानाच योग्य वेळी सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहे, असे आश्वासन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले. सरकार दिलेला एकही शब्द फिरवणार नाही, असेही ते म्हणाले.
सध्या राज्यभर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी सुरू असताना विशेषतः कोल्हापूर, सांगली जिल्ह्यामध्ये पूरसदृश परिस्थितीचा धोका आहे. याकडे लक्ष वेधले असता मुख्यमंत्री म्हणाले की, आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. धरणातील पाण्याच्या विसर्गाचे योग्य नियोजन केले जात आहे. शेजारी असलेल्या राज्यांबरोबर त्यासंबंधी नियमितपणे संवाद साधला जात आहे. आपले अभियंते शेजारच्या राज्यांमध्ये उपस्थित असून त्यांच्या माध्यमातून आवश्यक ती माहिती घेतली जात आहे. गरजेनुसार योग्य उपाययोजना करण्यात येतील, असे फडणवीस यांनी सांगितले.