- राज्य
- 'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'
'शालेय विद्यार्थी हत्या प्रकरणी अघोरी बाबाची चौकशी करा'
महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा अरण गावकऱ्यांचा इशारा
सोलापूर: प्रतिनिधी
माढा तालुक्यातील अरण या गावातील विद्यार्थी कार्तिक खंडाळे या दहा वर्षीय मुलाचे 15 जुलै रोजी अपहरण झाले. त्यानंतर 19 जुलै रोजी त्याचा मृतदेह आढळून आला. या हत्येमागे गावातील अघोरी बाबा असल्याचा गावकऱ्यांचा दावा आहे. त्याच्यावर जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करावी, अशी गावकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा सोलापूर पुणे महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीवर मिळालेल्या चित्रणाच्या आधारे कार्तिकचा चुलत भाऊ संदेश खंडाळे याला अटक केली आहे. मात्र, संदेश हे या हत्येमागील प्यादे आहे. यामागचा खरा सूत्रधार राहुल रामचंद्र शिंदे उर्फ राहुल दादा अघोरी बाबा आहे. त्याने अघोरी जादूटोणा करण्यासाठीच कार्तिकचा बळी घेतला, असा गावकऱ्यांचा दावा आहे.
अघोरीबाबा हा अरण गावचाच मूळ रहिवासी आहे. गावातील सुरेश पाटील यांचा जेसीबी चोरण्याच्या प्रकरणात त्याचा हात होता. मात्र, त्याने पाटील यांची हातापाया पडून माफी मागितल्यावर पाटील यांनी त्याला सोडून दिले. त्यानंतर तो गाव सोडून निघून गेला. काही वर्षानंतर तो अघोरी बाबा बनूनच परतला. त्यानंतर त्याने गावात आश्रम सुरू केला. हा आश्रम ग्रामपंचायतीची परवानगी न घेता बांधला असल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे.
या अघोरीबाबाने समाजमाध्यमांचा वापर करून आपल्या अघोरी विद्येचा प्रचार केला आहे. त्याला फशी पडून शेकडो लोक आपल्या प्रापंचिक समस्या घेऊन बाबाकडे धाव घेत आहेत. वास्तविक अरण गाव ही संत सावता माळी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली आणि अध्यात्मिक वारसा असलेली भूमी आहे. अघोरी बाबाने या पवित्र भूमीला अपवित्र आणि बदनाम केल्याची गावकऱ्यांची भावना आहे.