- राज्य
- काँग्रेसपासून हक्काचा मतदार दुरावला?
काँग्रेसपासून हक्काचा मतदार दुरावला?
तब्बल पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
जळगाव: प्रतिनिधी
आतापर्यंत आदिवासी समाजाची एकगठ्ठा मते काँग्रेसच्या पदरात पडत आली आहेत. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तोंडावर असताना काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. खानदेशातील तब्बल पंचवीस हजार आदिवासी कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होत आहे.
विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटात मोठी पडझड सुरू आहे. अनेक महत्त्वाच्या नेत्यांसह सामान्य कार्यकर्ते सत्तारूढ महायुतीमधील घटक पक्षात जात आहेत. सर्वाधिक आवक भारतीय जनता पक्षात होत असून शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष प्रतिभा शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्या आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश करत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली हजारो आदिवासी कार्यकर्तेही काँग्रेस सोडून अजित पवार गटात जात आहेत. याचा धक्का काँग्रेसला राज्यभरात जाणवू शकतो.