- राज्य
- 'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री'
'विधानभवनात जाण्यासाठी पासची होते विक्री'
शशिकांत शिंदे आणि अनिल परब यांचे गंभीर आरोप
मुंबई: प्रतिनिधी
विधानभवनात जाण्यासाठी दिल्या जाणाऱ्या पासेसची पाच ते दहा हजार रुपयांमध्ये विक्री होत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी खुद्द सभागृहातच केला.
काल विधानभवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली.
ज्याने मारले त्याच्यावर कारवाई नाही. ज्याने मार खाल्ला त्याला अटक! जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल! म्हणजे आता आंदोलनेही करायची नाही का, असा सवाल शिंदे यांनी केला.
मोठी संसदीय परंपरा असलेल्या महाराष्ट्राच्या विधिमंडळात मारामाऱ्या होणे ही लाजिरवाणी बाब असल्याची टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली. एक आमदारच एकाला मारा म्हणून खूण करून सांगतात. दंगेखोरांपैकी एकाला पोलीस तंबाखू मळून देतात. एकाला एक आणि दुसऱ्याला दुसरा न्याय दिला जातो. विधानभवनातच कायदा सुव्यवस्था स्थिती धोक्यात आली आहे, असेही ते म्हणाले.
सदनात आमदारांनाच धोका निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आता चर्चा कसल्या करता? फार वेदनादायी चित्र बघायला मिळत आहे. आता कार्यकर्ते विधिमंडळ सभागृहात येणे, एवढेच बाकी आहे. एवढ्या गर्दीतून वाट काढणे अवघड होत असल्याची तक्रार महिला सदस्य सना मलिक यांनी केला आहे. इथे पासेस पाच, दहा हजार रुपयांमध्ये विकले जात आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.
आयनॉक्स थिएटरजवळ विधान भवनात प्रवेश करण्यासाठी पासची विक्री केली जाते. कोणाला किती पैसे द्यायचे, कुठे द्यायचे, पहिल्या प्रवेशद्वारावर किती पैसे द्यायचे, आपल्या प्रवेशद्वारावर किती द्यायचे हे सर्व ठरलेले असते. हे सगळे आपण शपथपत्रावर लिहून देऊ शकतो, असा दावा परब यांनी केला.