- राज्य
- संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार
संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्याला संधी: शरद पवार
शशिकांत शिंदे यांच्या प्रदेशाध्यक्ष निवडीमागचे उलगडले कारण
मुंबई: प्रतिनिधी
सध्या महाराष्ट्रासाठी संघर्षाचा काळ आहे. आपण ज्यांना बळ दिले ते सत्तेत जाऊन बसले आहेत. शशिकांत शिंदे हे संघर्ष करणारे नेते आहेत. त्यामुळे संघर्षाच्या काळात संघर्ष करणाऱ्या व्यक्तीला संधी दिली आहे, असे स्पष्ट करतानाच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी आगामी काळात पक्ष पुन्हा मोठी उभारी घेईल, असा विश्वास व्यक्त केला.
शशिकांत शिंदे हे माथाडी कामगाराच्या घरात लहानाचे मोठे झाले. लिपिक म्हणून काम केले. ते प्रचंड कष्ट करणारे कार्यकर्ते आहेत. संघर्षाच्या वेळी त्यांनी कधी माघार घेतली नाही. सामान्य माणसाशी जोडलेली नाळ, विचारांशी निष्ठा यांच्यात त्यांनी कधी तडजोड केली नाही, अशा शब्दात पवार यांनी शिंदे यांचे कौतुक केले. विचाराने काम करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष जोमाने उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
मावळते प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या कामाचेही पवार यांनी कौतुक केले. पाटील यांनी तब्बल सात वर्ष पक्षाला नेतृत्व दिले. अडचणीच्या काळातही त्यांनी साथ सोडली नाही. अहोरात्र कष्ट केले. राजकारणात पदार्पणाच्या काळातच त्यांना थेट अर्थमंत्री पद देण्यात आले. ती जबाबदारी समर्थपणे पार पाडताना त्यांनी तब्बल नऊ अर्थसंकल्प मांडले. महाराष्ट्रावर संकट आले असताना त्यांच्यावर गृहमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आली. ती देखील त्यांनी कणखरपणे पेलली, असे पवार म्हणाले.
संपूर्ण राज्याचे दौरे करा. गावागावापर्यंत पोहोचा. तालुका तालुक्याची परिस्थिती जाणून घ्या. पक्षाच्या इतर मागासवर्ग विभागाचे अध्यक्ष राज राजापूरकर यांनी आपल्याला प्रत्येक तालुक्याचा अहवाल सादर केला आहे. असेच काम प्रत्येकाने करायचे आहे. मग पक्ष पुन्हा कसा उभा राहत नाही तेच पाहू, असे सांगत पवार यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये नवा जोश निर्माण करण्याचा प्रयत्न केला.