... ते काही आम्हाला बांधील नाहीत: सुषमा अंधारे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर व्यक्त केली प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि राज ठाकरे आम्हाला बांधील नाहीत. मुख्यमंत्र्यांना भेटायचे की नाही, हा त्यांचा प्रश्न आहे. फक्त महाराष्ट्राच्या हिताचा निर्णय घ्यायचा की महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणाऱ्यांच्या बरोबर जायचे, याचा निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. चेंडू आता त्यांच्या कोर्टात आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केली.
शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत युती करणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात वांद्रे येथील ताज लँड एंड या पंचतारांकित हॉटेलमध्ये सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेत फडणवीस यांनी संभाव्य युतीला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात येते.
महाराष्ट्राच्या हितापेक्षा आपला इगो मोठा नाही. राज्याचे हित साधले जाणार असेल तर आपण आपला इगो बाजूला ठेवण्यास तयार आहोत, असे राज ठाकरे यांनी सांगितले होते. आमचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह आमच्या अन्य नेत्यांनी राज ठाकरे यांच्या या भूमिकेचे स्वागत केले आहे. मात्र मनसेच्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली नाही, असेही अंधारे म्हणाल्या.