- राज्य
- 'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान'
'घराणेशाहीमुळे अल्पसंख्यांक समाजाचे नुकसान'
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष सलीम सारंग यांचा घणाघाती आरोप
नवी मुंबई: प्रतिनिधी
कर्तृत्व आणि कर्यक्षमतेपेक्षा घराणेशाहीने पदे लाटणाऱ्या नेत्यांमुळे अल्पसंख्यांक समाजाच्या प्रगतीला खीळ बसत असल्याचा घणाघाती आरोप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि अल्पसंख्य नेते सलीम सारंग यांनी केला.
समाजासाठी कोणतेही काम न करता केवळ पूर्वपुण्याईवर पदे मिळविणारे नेते समाजाशी जोडलेले नसतात. समाजकारण आणि राजकारण यांची सांगड न घालता ते केवळ राजकारण करीत राहतात. त्यामुळे केवळ त्यांचे व्यक्तिगत भले होत रहाते. त्यांचा समाजाला आणि पर्यायाने पक्षाला कोणताही फायदा होत नाही, हे सारंग यांनी निदर्शनास आणून दिले.
राजकीय पक्षांकडून देखील समाजासाठी आस्थेने काम करणाऱ्या, पक्ष आणि नेतृत्वावर निष्ठा ठेवणाऱ्या कार्यकर्त्यांना बळ देण्याऐवजी घराणेशाहीने पुढे आलेल्या नेत्यांना पदे दिली जातात. ज्यांनी समाजासाठी किंवा पक्षासाठी कोणतेही काम केलेले नाही अशा लोकांनाही केवळ ते कोणाचे सुपुत्र किंवा आप्तेष्ट आहेत म्हणून थेट संधी दिली जाते, या कटू वास्तवाकडे सारंग यांनी लक्ष वेधले.
समाजासाठी खऱ्या अर्थाने काम करणारे अल्पसंख्यांक समाजाचे कार्यकर्ते वर्षानुवर्ष समाज आणि पक्षासाठी कष्ट करत राहतात. समाजाला पक्षाशी जोडण्यासाठी जिवापाड मेहनत करतात. सभा, निवडणुका, एखाद्या मुद्द्यावर विरोधकांची सामना करणे अशा बाबतीत पुढे राहतात, त्यांना पक्षाकडून कायम उपेक्षितच राहावे लागते. अशा कार्यकर्त्यांनी कायम सतरंज्या घालणे आणि उचलणे हेच काम करत राहावे का, असा संतप्त सवालही सारंग करतात.
केवळ राजकीय पार्श्वभूमीमुळे पद मिळालेल्या नेत्यांकडून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आणि समाजाला बरोबर घेऊन पुढे जाण्याची अपेक्षा असते. मात्र, यापैकी बहुसंख्य नेते समाजासाठी काम करण्याऐवजी स्वतःचे गट तट तयार करतात आणि कार्यकर्त्यांना उपेक्षित ठेवतात. पक्षात फूट पाडत राहतात. ही अल्पसंख्यांक समाजाची, विशेषतः मुस्लिम समाजाची शोकांतिका आहे, असे मत सारंग यांनी व्यक्त केले.
समाजाची एकजूट करून त्याचे खंबीर नेतृत्व करण्याची क्षमता असलेल्या कार्यकर्त्याला बोल देण्याऐवजी कुवत नसलेल्या व्यक्तीला एकाच वेळी दोन दोन पदे देऊन राजकीय पक्ष जोगवा मागणाऱ्या तथाकथित खानदानी नेत्यांना मोठे करून राजकीय पक्ष समाजाचे आणि स्वतःचे देखील आटोणात नुकसान करत आहेत, याची जाणीव सारंग यांनी करून दिली. या वास्तवाचा आढावा घेऊन राजकीय पक्षांनी वेळीच योग्य त्या सुधारणा कराव्या, असे आवाहनही त्यांनी केले.