- राज्य
- फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात
फडणवीस आणि शहा यांच्या भेटीमुळे वादग्रस्त मंत्र्यांचे पद धोक्यात
माणिकराव कोकाटे आणि योगेश कदम यांच्या डोक्यावर टांगती तलवार
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यात त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे चाणक्य समजल्या जाणाऱ्या अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत पक्ष आणि सरकारला अडचणीत आणणाऱ्या मंत्र्यांबद्दल चर्चा झाली असून कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या मंत्री पदावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.
पावसाळी अधिवेशनादरम्यान खुद्द विधिमंडळातच मोबाईलवर पत्ते खेळत असल्याचा आरोप असलेले कृषिमंत्री माणिकराव ठाकरे यांच्या राजीनाम्याची मागणी केवळ राजकीय विरोधकांकडूनच नव्हे तर सामाजिक कार्यकर्त्यांकडून देखील केली जात आहे. त्याचप्रमाणे बंदी असून देखील आईच्या नावावर लेडीज बार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यावरही टीकेची झोड उठवली जात आहे.
माणिकराव कोकाटे हे राज्यातील सर्वात मोठा पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील नेते आहेत. त्यांचे मंत्रीपद काढून घेण्यापेक्षा त्यांच्याकडे कृषिमंत्री पदाचे खाते काढून घेऊन केवळ खांदेपालट करण्याचा पर्याय पक्षाकडून सुचवण्यात आल्याचे समजते आहे. त्याचप्रमाणे योगेश कदम हे देखील भाजपाच्या मित्र पक्षातील अर्थात शिवसेना शिंदे गटातील आहेत. अशा मंत्र्यांमुळे केवळ सरकार आणि महायुतीची नव्हे तर भारतीय जनता पक्षाची देखील बदनामी होत असल्याबद्दल गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे या दोन्ही मंत्र्यांच्या मंत्रिपदावर टांगती तलवार असल्याचे समजले जात आहे. .