- राज्य
- 'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'
'मुंडे घराण्याचे दहशतीचे राजकारण आता संपले'
सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा मोठा दावा
मुंबई: प्रतिनिधी
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आल्यानंतर तत्कालीन मंत्री धनंजय मुंडे यांच्या बद्दल राज्यभरात तीव्र संताप व्यक्त झाला आणि मुंडे यांचा जनमताच्या रेट्याने राजीनामा घेण्यात आला. आता पूर्ण मुंडे कुटुंबाचे दहशतीचे राजकारण संपल्याचे चित्र आहे, असा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला.
अजित पवार यांच्या बीड येथील कार्यक्रमात धनंजय मुंडे दिसले नाहीत. अजित पवार यांनी आपल्या भाषणात बोलताना, आका असो की काका, कोणालाही सोडणार नाही, असे वक्तव्य केले. इथे कोणी बड्या बापाचा बेटा असला तरीही त्याच्यावर कारवाई होईल, असेही अजित पवार म्हणाले. मुख्य म्हणजे राजाभाऊ मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश देण्यात आला. या सगळ्याचा अर्थ या पुढील काळात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे दहशतीचे राजकारण संपुष्टात आले आहे, असा दावा दमानिया यांनी केला.
कालपासून अचानक माध्यमांमध्ये, संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा काही संबंध असल्याचे आढळून आले नाही, अशा अर्थाच्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आहेत. याचा अर्थ धनंजय मुंडे हे राजकारणातून बाजूला पडले आहेत, असे कार्यकर्त्यांना वाटू नये म्हणून या बातम्या पेरल्या जात आहेत, असेही दमानिया म्हणाल्या.
... या आरोपांची सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी दखल
लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेऊन मतदान घोटाळेबाबत पुरावे सादर केले. एक कोटी मतदार वाढीपासून एकाच व्यक्तीच्या दोन राज्यातील मतदानापर्यंत त्यांनी हे जे आरोप केले त्या सर्व आरोपांची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने त्यावर कारवाई करावी, अशी अपेक्षा दमानिया यांनी व्यक्त केली. राहुल गांधी यांनी एका मतदारसंघातील मतदार यादी वरून शोध घेऊन एवढे घोटाळे बाहेर काढले आहेत. आता निवडणूक आयोगाने संपूर्ण देशाची मतदार यादी प्रसिद्ध करावी. त्यामुळे सद्यस्थितीचा शोध घेता येईल, असेही त्या म्हणाल्या.