- राज्य
- 'सरकार कर्जमाफीबद्दल गंभीर, लवकरच निर्णय'
'सरकार कर्जमाफीबद्दल गंभीर, लवकरच निर्णय'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा
मुंबई: प्रतिनिधी
शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याबाबत सरकार गंभीर असून त्याबाबतचा निर्णय लवकरच घेतला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. सध्याच्या काळात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून त्यांना तातडीने मदत पुरवणे, याला प्राधान्य दिले जात आहे, त्यांनी स्पष्ट केले.
राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टीसदृश पाऊस पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे. अनेक जनावरे वाहून गेली आहेत. या सर्व घटनांचा आढावा आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या सोलापूर दौऱ्यावर रवाना होत आहेत. मी स्वतः परभणी येथे जाऊन परिस्थितीची पाहणी करणार आहे. सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. सरकार ठामपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, अशी ग्वाही शिंदे यांनी दिली.
अति पावसामुळे साथीच्या रोगांचा फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यासाठी आरोग्य विभाग सज्ज आहे. ढगफुटी झालेल्या ठिकाणी पीठ, भांडी, कपडे, औषधे, साड्या असे साहित्य रवाना करण्यात आले आहे. सर्व बाधित शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी भरीव मदत देण्यात येईल. आम्ही केंद्र सरकारच्या संपर्कात आहोत. केंद्र आणि राज्य सरकार दोघांकडूनही शेतकऱ्यांना अधिकाधिक मदत देण्यात येईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.