- राज्य
- 'फडणवीस संस्कृती म्हणजेच छपरी संस्कृती का?:
'फडणवीस संस्कृती म्हणजेच छपरी संस्कृती का?:
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा भाजपला सवाल
मुंबई: प्रतिनिधी
ज्या काळात केंद्रात अटल बिहारी वाजपेयी यांच्यासारखे सुसंस्कृत नेतृत्व होते त्या काळात प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी यांच्यासारखे सुसंस्कृत विरोधक संयमाने टीका करत होते. केंद्रात मोदी, शहांचे सरकार आल्यानंतर आणि राज्याला देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व मिळाल्यानंतर वाचाळवीरांची फौज विरोधकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. हीच फडणवीस संस्कृती म्हणजे छपरी संस्कृती म्हणायचे का, असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने भारतीय जनता पक्षाला केला आहे.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर तसेच त्यांचे वडील राजारामबापू पाटील यांच्यावर देखील टीका केली. त्यानंतर राजकीय वर्तुळात त्याच्यावर तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. भाजपामध्ये पडळकर यांच्यासह चित्रा वाघ, सदाभाऊ खोत, प्रसाद लाड, प्रवीण दरेकर यांच्यासारखे नेते असभ्य भाषेत महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला पायदळी तुडवून विरोधकांवर टीका करत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते रविकांत वर्पे यांनी केला.
भाजपाने मोकाट सोडलेल्या पडळकर यांनी या भाषेत जयंत पाटील यांच्यावर टीका केली ती अत्यंत निंदनीय आहे. राजाराम बपू पाटील यांचे स्वातंत्र्यलढ्यात योगदान आहे. त्यांनी सहकार चळवळीची पाळीमुळे या राज्यात रुजवली. त्यांचा अवमान करणे हे राजकीय संस्कृती रसातळाला गेल्याचे लक्षण आहे, असे वरपे म्हणाले.
शरद पवार सत्तेत असताना बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, नितीन गडकरी या विरोधातील नेत्यांनी त्यांच्यावर कठोर टीका केली. मात्र कधीही त्यांनी पातळी सोडली नाही. व्यक्तिगत अथवा कुटुंबातील इतर व्यक्तींवर त्यांनी कधीही टीका केली नाही. राजकारणातील ही संस्कृती आता लयाला गेली आहे, असे वरपे यांनी नमूद केले.