- देश-विदेश
- 'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...'
'जर राहुल गांधी पंतप्रधान असते तर...'
युद्धविराम आणि ऑपरेशन सिंदूर संदर्भात काँग्रेसचा मोठा दावा
हैदराबाद: वृत्तसंस्था
भारताला केवळ राहुल गांधी हेच खंबीर नेतृत्व देऊ शकतात. नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी राहुल गांधी जर आत्ता पंतप्रधान असते तर पाकव्याप्त काश्मीर भारताच्या ताब्यात आला असता, असा दावा काँग्रेसने केला आहे. पाकिस्तान बरोबर युद्धविराम जाहीर करून ऑपरेशन सिंदूर स्थगित करण्याच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे.
काँग्रेसने आयोजित केलेल्या जय हिंद यात्रेच्या निमित्ताने बोलताना तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी युद्धविराम करण्याच्या निर्णयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कठोर टीका केली. या काळात देशाला राहुल गांधी यांच्या कणखर नेतृत्वाची आवश्यकता असल्याचा दावाही त्यांनी केला
नरेंद्र मोदी हे कालबाह्य नाणे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे कालबाह्य झालेल्या नाण्यासारखे निरुपयोगी आहे. देशाला इंदिरा गांधी यांच्यासारख्या शक्तिशाली नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व केवळ राहुल गांधी हेच देऊ शकतात, असा दावा रेड्डी यांनी यावेळी केला. पाकिस्तानने भारताचे राफेल हे लढाऊ विमान पाडले. त्यासंबंधी सरकारने कोणतेही स्पष्टीकरण दिले नाही, असा आरोपही त्यांनी केला.
अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविरामाचा निर्णय
ऑपरेशन सिंदूर स्थगित करून पाकिस्तान बरोबर युद्धविराम करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या दबावाखाली घेतला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सर्व विरोधी पक्ष एकजुटीने सरकारच्या पाठीशी होते. पाकिस्तान विरोधी कारवाईसाठी त्यांनी सरकारला पाठिंबा दिला. मात्र, युद्धविरामाचा निर्णय घेण्यापूर्वी पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना विश्वासात घेतले नाही, असा आरोप रेड्डी यांनी केला आहे. अमेरिकेच्या दबावाखाली घेतलेल्या युद्धविरामाच्या निर्णयाने भारताच्या आत्मसन्मानाला ठेच पोहोचली आहे, असेही रेड्डी म्हणाले.
ही जय हिंद नव्हे तर जय पाकिस्तान यात्रा
काँग्रेसकडून करण्यात येणाऱ्या या आरोपांवर भारतीय जनता पक्षाने कठोर शब्दात पलटवार केला आहे. काँग्रेस कडून काढण्यात येणारी यात्रा ही जय हिंद यात्रा नव्हे तर जय पाकिस्तान यात्रा असल्याचा आरोप भाजप प्रवक्ते संदीप पात्रा यांनी केला आहे. काँग्रेसने असे आरोप करून आणि शंका काढून भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा अवमान केला असल्याचा आरोपही त्यांनी केला. दहशतवाद्यांना सन्मानाने पंतप्रधान कार्यालयात प्राचार्य करणाऱ्या काँग्रेस कडून आपल्या कृत्यांची पुनरावृत्ती केली जात आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेत्यांना नाही राष्ट्रीय सुरक्षेची समज
काँग्रेस नेत्यांना राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्द्यांची समज नसल्याचा आरोप भाजपच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला आहे. पाकिस्तानने भारताचे राफेल विमान पाडले असते तर त्याचे अवशेष मिळाले असते. चित्रण किंवा छायाचित्र उपलब्ध झाली असती. आंतरराष्ट्रीय पातळीवर दुजोर मिळाला असता. मात्र, असे काहीही झालेले नाही. पाकिस्तानच्या प्रचार यंत्रणेची भाषा काँग्रेस वापरत आहे, असा आरोपही त्यांनी केला.