- राज्य
- 'रडगाणं सोडा आणि जनमताचा आदर करा'
'रडगाणं सोडा आणि जनमताचा आदर करा'
एकनाथ शिंदे यांचा महाविकास आघाडीला टोला
मुंबई: प्रतिनिधी
नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी यांच्या मतांमध्ये तब्बल एक कोटी मतांपक्षाही अधिक मतांचा फरक आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांनी निवडणूक यंत्राच्या नावाने रडगाणे गाणे थांबवावे आणि जनमताचा आदर करून पराभव मान्य करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केले.
महायुती सरकारने आपल्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणावर विकास कामे मार्गी लावली त्याचप्रमाणे लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडका शेतकरी अशा अनेक कल्याणकारी योजना प्रभावीपणे अमलात आणल्या. महायुतीच्या या कामामुळे विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला आणि महायुती उत्तम मताधिक्याने सत्तेवर आली. ही बाब विरोधकांनी मान्य करणे गरजेचे आहे, असे शिंदे यांनी नमूद केले.
मतदान यंत्र, निवडणूक आयोगासह न्याय यंत्रणेच्या नावाने गळे काढणे ही विरोधकांची जुनी सवय आहे. मात्र, संवैधानिक यंत्रणांबाबत आरोप करणे योग्य नाही. मतदान यंत्राबाबत आक्षेप असेल तर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ल्प मताधिक्याने जिंकले, केरळ मधील पोटनिवडणुकीत प्रियंका गांधी जिंकल्या, झारखंड सारख्या राज्यामध्ये विरोधकांचे सरकार आले त्यावेळी मतदान यंत्राबाबत आक्षेप का घेतला नाही, असा सवाल शिंदे यांनी केला. राज्यातील जनतेने आपल्यावर व्यक्त केलेल्या विश्वासामुळे आपल्यावरची जबाबदारी वाढली असल्याचेही त्यांनी नमूद केले.