- राज्य
- 'मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात दंगली घडवण्याचा कट'
'मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात दंगली घडवण्याचा कट'
मराठा आरक्षण आंदोलन मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस यांच्यावर आरोप
परभणी: प्रतिनिधी
मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात राज्यात दंगली घडवण्याचा कट रचण्यात आला असून गोवा येथे झालेल्या इतर मागासवर्गीय समाजाच्या मेळाव्यात फडणवीस यांनी त्यांचे कान भरले आहेत. फडणवीस यांच्याकडून तसा प्रकारचा प्रयत्न झाल्यास महाराष्ट्र कायमचा बंद होईल आणि तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही त्रास सहन करावा लागेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून सरसकट आरक्षण दिले जावे आणि सगे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी समाजाला केले आहे. जरांगे पाटील हे सध्या मराठवाड्याच्या संवाद यात्रेत दौऱ्यावर आहेत.
फडणवीस यांनी गोव्यातील अधिवेशनात बोलताना आपण ओबीसींसाठी लढणार असल्याचे जाहीर केले. मग मराठ्यांसाठी कोण लढणार? दलित मुस्लिम समाजातील मतदारांनी तुम्हाला मते दिली नाहीत का, असे सवाल जरांगे पाटील यांनी केले.
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांबद्दल द्वेष
देवेंद्र फडणवीस यांच्या मनात मराठ्यांच्याबद्दल ठासून द्वेष भरला आहे. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक मुंबईमध्ये येणार असल्याबद्दल फडणवीस यांना माध्यमांनी प्रश्न विचारला असता त्यांनी, पोलीस बघून घेतील, असे उत्तर दिले. फडणवीस म्हणजे पोलीस आणि पोलीस म्हणजे फडणवीस, असे समीकरण राज्यात ठसलेले आहे. तुम्ही काय मागच्या सारखी हल्ले घडवून आणणार का, असा सवाल करून, एका पोराच्या अंगाला जरी धक्का लागला तरी सगळे राज्य बंद करू, असेही जरांगे म्हणाले.
आरक्षण घेऊ आणि ओबीसीमधूनच घेऊ
आपण 27 ऑगस्ट रोजी अंतरवाल सराटी येथून मुंबईकडे निघणार आहोत. समाज बांधवांनी आपल्याला मिळेल त्या मार्गाने मुंबई प्रवेश करावा आणि आंदोलनात सहभागी व्हावे. यावेळी माघार घ्यायची नाही. यावेळी आरक्षण घेऊ आणि ओबीसीमधूनच घेऊ, असे जरांगे पाटील यांनी सांगितले.